![](https://konkantoday.com/wp-content/uploads/2022/07/ratnagiri-zp-aaa_202111729233.jpg)
रत्नागिरी जिल्हा होणार प्लास्टिकमुक्त! जिल्ह्यातील टाकाऊ प्लास्टिक गोळा करून कंपन्यांना विकणार
रत्नागिरी : शासनाने प्लास्टिकवर बंदी आणली आहे. जि. प. ने सुद्धा प्लास्टिकमुक्तीसाठी विविध उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून गावागावात प्लास्टिकमुक्त मोहीम राबवण्यात येणार आहे. काही गावात प्रायोगिक तत्वावर विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहेत. शुक्रवारी या उपक्रमाबाबत जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. यावेळी अमरहिंद सिंज कंपनीचे हेमचंद्र हळदणकर, प्रकल्प संचालक श्रीमती एन. बी. घाणेकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी रोहीत देसाई, सह्याद्री निसर्गचे भाऊ काटदरे, कुणाल ठक्कर, एमआयडीसीचे विभागीय अधिकारी आणि प्लास्टीक विकत घेणार्या पाच कंपनींचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंटची अंमलबजावणी पंधरा दिवसात होणार असून लवकरच जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्याबरोबर बैठकीत घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गाव प्लास्टीकमुक्त करण्यासाठी मोहीम हाती घेण्यात येत असून प्लास्टिकवर प्रक्रिया करणार्या कंपन्यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. जिल्ह्यात गावागावांमधील प्लास्टिक गोळा करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य, नागरिक, स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात येईल. ते प्लास्टिक खडपोलीतील अमरहिंद सिंज कंपनीने विकत घेऊन त्यावर प्रक्रिया करण्याची तयारी दर्शवली आहे. कचरा गोळा करणे, वर्गीकरण करणे, प्लास्टीक जाळण्यापासून रोखणे याची जनजागृती व प्रशिक्षण जिल्हा परिषदेसह स्वयंसेवी संस्था करणार आहे. प्लास्टीक गोळा करून कंपनीला विकत देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे असेल. यासाठी येणार्या खर्चाचेही अंदाजपत्रक बनवण्यात येणार आहे.