
रत्नागिरी मनसेची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ उप प्रादेशिक अधिकारी कार्यालयावर धडक
रत्नागिरी शहरातील आणि एम आय डी सी परिसरातील प्रदूषणाबाबत विचारला जाब
रत्नागिरी : – रत्नागिरी मनसे ने आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकारी कार्यालयावर धडक देऊन संबंधित अधिकाऱ्यां समोर विविध प्रश्न उपस्थित केले. जिल्ह्याचे ठिकाण असून देखील येथे पूर्ण वेळ उपप्रादेशिक अधिकारी उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक महाभागांना मोकळे रान मिळाले आहे. ते मिळाले आहे की जाणीवपूर्वक दिले आहे.रत्नागिरी एमआयडीसी परिसरातील काही कंपन्या प्रदूषित पाणी खाडी समुद्रामध्ये सोडत असून यामुळे समुद्र, खाडी प्रदूषित होत आहेत त्याचा परिणाम मत्स्य प्रजानन वर होत आहे. त्यामुळे मत्स्यउत्पादनात घट होत असल्याचे निदर्शनास आले असून या कंपन्यांवर आजवर इतकी ओरड होऊन देखील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने काय कारवाई करण्यात आली? असा सवाल उपस्थित केला.
रोज संध्याकाळी साळवी स्टॉप पासून पुढील भागात एक प्रकारचा घाणेरडा वास सुरु होतो. तो कोणत्यातरी मत्स्य प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यातुन सोडला जातो त्यावर देखील आजवर अनेक वेळा तक्रारी झाल्या त्यावर काय कारवाई केली? त्या प्रमाणे रत्नागिरी नगर परिषदेच्या हद्दीतील गटारांमधून प्रदूषित व कचरायुक्त सांडपाणी मांडवी खाडी समुद्रामध्ये सोडण्यात येत असून नगरपरिषदेवर काय कारवाई करणार असा सवाल उपस्थित केला. रत्नागिरी एमआयडीसी मध्ये स्वतःची प्रदूषित पाणी स्वच्छ करण्याची यंत्रणा नसल्यामुळे अनेक कंपन्या प्रदूषित पाणी खाडी समुद्रात सोडत आहेत त्यामुळे एमआयडीसी विभागाला कशाप्रकारे सूचना देण्यात येणार? अशा अनेक प्रश्नाचा भडीमार जिल्हाध्यक्ष अविनाश सौन्दळकर उपाजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर तालुकाध्यक्ष सचिन शिंदे जिल्हा सचिव महेंद्र गुळेकर शहरअध्यक्ष बाबय भाटकर यांचे कडून करण्यात आला. त्याचप्रमाणे लांजा तालुक्यामध्ये काही भागांमध्ये स्टोन क्रशर उभारण्यात आली असून यामुळे गावातल्या जनतेला मनस्ताप होत असल्याची तक्रार मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी उपस्थित केला. यावर संबंधित अधिकारी काहीच सुयोग्य देऊ शकले नाहीत.
याउपर तुम्हीच आम्हाला अशा कंपन्याची नावे द्या आम्ही कारवाई करू अशी असे आश्वासन देऊ लागले. यावरून संबंधित विभाग फक्त शोभेचे बाहुले असल्याचे उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर यांनी सुनावले. 5 मे पर्यंत अशा कंपनीवर कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यालयास टाळे ठोकून आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला. यावेळी उपतालुकाध्यक्ष रुपेश चव्हाण सतीश खामकर माहीला शहर अध्यक्ष सुश्मिता सुर्वे शहर सचिव संपदा राणा शैलेश मुकादम गौरव चव्हाण इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.