जिल्ह्यात मुसळधार पावसाने विविध ठिकाणी नुकसान

रत्नागिरी: जिल्ह्यात सलग दोन दिवस मुसळधार पाऊस झाला असून  अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. संगमेश्वर पांगरी रस्त्यावर दरड कोसळली तर, रत्नागिरीत पूर्णगड येथे भिंत कोसळली आणि किल्ला येथे घरांची संरक्षक भिंत कोसळली. धाऊलवल्लीत रस्ता खचला आहे.  पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. सततच्या पावसामुळे बावनदी ते देवरूख रस्तावर ठिकठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. पांगरी गावाजवळ दोन ठिकाणी मोठे दगड रस्त्यावर आले होते. पन्नास मीटरच्या भागात रस्त्यावर माती आल्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत होती; मात्र ही माहिती मिळाल्यानंतर बांधकाम विभागाने ठेकेदाराला माहिती दिली आणि माती, दगड हटवण्याच्या सूचना दिल्या. पोकलेनच्या मदतीने रस्त्यावर आलेली दरड बाजूला करण्यात आली. डोंगराकडील ज्या भागात फक्त माती आहे, तेथे पुन्हा दरड कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या रस्त्यावरून वाहने हाकताना काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
संगमेश्वर तालुक्यातील शिवने-ताम्हाणे रस्त्यावर दरड कोसळल्याने याचा फटका वाहतुकीला बसला आहे. राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली आंबेलकरवाडी येथे यावर्षी बांधलेल्या संरक्षक भिंतीचा भराव खचला आहे. या मार्गावरील एसटी वाहतूक बंद आहे. कोदवली, अर्जुना नदीचे पाणी वाढले आहे. रत्नागिरी तालुक्यातील पुर्णगड येथे पावसामुळे विलास पवार यांच्या घराजवळ भिंत कोसळून तर शंकर पवार यांच्या शौचालयाचे अंशतः नुकसान झाले. तसेच किल्ला दसपट वाडी येथील भागेश्वर मंदिर आवाराचा गडगा कोसळून पावसाचे पाणी वाहून नेणारा पर्‍या बंद झाला आहे. रस्त्यावरून वाहत जाणारे पाणी लोकांच्या घरात शिरून नुकसान झाले. या ठिकाणी राहणारे जाधव,  बापर्डेकर,  ढोले यांच्या घरात पाणी शिरल्याने तेथील नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button