पूर्णगड बौद्धवाडी येथे घरावर कोसळली संरक्षक भिंत
पावस : शुक्रवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसाने रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड बौद्धवाडी येथील विलास तुकाराम पवार यांच्या घरावर संरक्षक भिंत पडल्याने घराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
दिनांक 24 जून रोजी सायंकाळनंतर पावसाने सुरुवात केली. रात्रीच्या वेळी त्याचे प्रमाण वाढत गेले. पूर्णगड बौद्धवाडी येथे घरांच्या संरक्षणाकरिता 55 फूट उंचीची संरक्षक भिंत बांधण्यात आलेली होती. सतत पडणाऱ्या पावसामुळे पवार यांच्या घरावर ही भिंत कोसळली. ही घटना 25 जून रोजी सकाळी सव्वा पाचच्या दरम्यान घडली. त्यावेळी विलास पवार व त्यांची पत्नी घरात होती. परंतु सुदैवाने त्या दोघांनाही कोणतीही इजा झाली नाही. मात्र घराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.