
आता पुन्हा राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली
गेल्या अनेक दिवसापासून राज्यात पावसाने दडी मारली होती. मात्र, आता पुन्हा राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. तसेच, राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाची प्रतिक्षा कायम आहे. दरम्यान, आजपासून राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. तब्बल महिनाभराच्या प्रतिक्षेनंतर पाऊस होत आहे. राज्यातील नंदुरबार, वाशिम, परभणी, अमरावती, भंडारा या जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. पुण्यासह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांनाही आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. या पावसामुळे अनेक भागात उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. संपूर्ण राज्यात गुरुवारी आणि शुक्रवारी बहुतांश ठिकाणी पाऊस होईल, असा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालं असून हे क्षेत्र पश्चिम आणि उत्तर-पश्चिमेकडे सरकण्याची चिन्हे दिसत असल्याने पाऊस पुन्हा सक्रीय होत आहे.
www.konkantoday.com