लोकमान्य टिळक अजूनही बंदीवासात….
ॲड. धनंजय जगन्नाथ भावे-
९४२२०५२३३०
दिनांक-१७/०२/२०२१
मुंबईमधील लोकल सुरु झाली, राणीची बागेमध्ये आबालवृध्द प्राणी-पक्षी दर्शन घेउ लागले, हॉटेल्स सुरु झाली, सिनेमागृहे सुरु झाली, नाट्यगृह सुरु झाले, देवस्थानची गर्दी पेपरमध्ये फोटोसकट छापून येऊ लागली, समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले, पर्यटकांना सर्व सोयी सुविधा (बार सहित) सुरु झाल्या, पर्यटन परिषदा झाल्या, कोकणात असे करणार, तसे करणार, पर्यटनाचा विकास जलदगतीने होणार, करणार, पर्यटनासाठी आकर्षक घोषणाही करण्यात आल्या.
पण आम्हा रत्नागिरीकरांना लाज वाटते सांगायला, “लोकमान्य टिळकांच्या स्मृतीशताब्दी वर्षामध्ये आजही समस्त पर्यटक ज्या आदराच्या भावनेने रत्नागिरीमध्ये लोकमान्य टिळक जन्मभूमीचे दर्शन घेण्यासाठी येतात ते रोज टिळक जन्मस्थान बंद असल्याची पाटी पाहून गेटाबाहेरून शरीर वेडे-वाकडे करीत आणि फोटो येण्यासाठी तोल सांभाळत फोटो घेऊन जात आहेत हे आम्ही दररोज पहात आहोत.”
याबाबत अनेकांनी अनेकदा टिळक जन्मभूमी पर्यटकांना खुली करण्याबाबत सूचना केल्या पण अद्यापही स्थानिक लोकप्रतिनिधी, नगराध्यक्षमहोदय, आणि त्याचबरोबर पुरातत्व विभागाला जाग आलेली नाही हे रत्नागिरीकरांचे दुर्देव आहे असेच म्हणावे लागेल.
खरे तर आता शाळांच्या सहली बंद आहेत. त्यामुळे पर्यटक झुंडीने येत नाहीत. जे येतात ते केवळ लोकमान्यांचे इतिहासातील महत्व जाणणारे येतात आणि त्यांची संख्या कमी असते त्यामुळे टिळक जन्मस्थानाजवळ कोरोनाविषयी घेण्याच्या काळजीचा इतरत्र उडतो😭 आहे तसा फज्जा उडण्याचीही शक्यता🙄 नाही. सर्व प्रकारची काळजी घेणेही अशक्य नाही.
तरीही आज दुपारी १२ वाजेपर्यंतच्या पहाणीनुसार लोकमान्य टिळक अद्यापही जन्मस्थानामध्ये बंदिवासातच आहेत ते केवळ पुरातत्व खात्याच्या कोणत्या हट्टापायी बरे ? पुरातत्व खात्याच्या अधिकारी वर्गाच्या डोळ्यावर कुण्या राजकारण्यांनी तर पट्टी बांधली नाही ना ?