
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा राज्यात सर्वोत्तम
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शैक्षणिक दर्जा राज्यात सर्वोत्तम ठरला आहे. दहावी, बारावी बोर्डासह शिष्यवृत्तीमध्ये गुणवत्तापूर्ण कामगिरी करणार्या रत्नागिरी जिल्ह्याने राष्ट्रीय संपादणूक सर्वेेक्षणांतर्गत (न्यास) परीक्षेत राज्यात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. केंद्र शासनातर्फे घेण्यात आलेल्या न्यासच्या परीक्षेत रत्नागिरी जिल्ह्याने राज्यात पाचवीमध्ये दुसरा तर तिसरीच्या वर्गात चौथा क्रमांक पटकावला आहे. या परीक्षांमध्ये राज्यातील 36 जिल्ह्यातील 34 लाख विद्यार्थी बसलेले होते. गेल्या दीड वर्षात जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून विशेष नियोजन केले जात आहे. सीईओ डॉ. जाखड यांनी पहिले पाऊल, मोकळा श्वास, ‘ध्यास व्याकरणाचा, भाषा समृध्दीचा’, आमचा रत्नागिरीचा भास्कराचार्य, जाणू विज्ञान अनुभव विज्ञान, शिष्यवृत्ती सराव परीक्षा, रत्नागिरी टॅलेंट सर्च असे शैक्षणिक उपक्रम राबविले होते. त्याचा फायदा न्यासच्या परीक्षेत झाल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. भाषा, गणित आणि सामाजिक शास्त्र विषयांची जादाची तयारी करून घेण्यासाठी केंद्र शासनाकडून न्यास परीक्षांचा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दोन फेर्या झाल्या असून प्रत्येक राज्यातील 3, 5, 8, 10 या चार इयत्तेमधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे तीन हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे. तिसरीच्या वर्गात चौथा क्रमांकाची कामगिरी केली आहे. तसेच पाचवीच्या वर्गामध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे. आठवीमध्ये जिल्हा 20 वा क्रमांकावर आहे.
यामध्ये प्राथमिक शिक्षण विभागाची कामगिरी चांगली झाली आहे. दहावी, बारावी बोर्डाच्या धर्तीवर या परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेतील गुणांकनावरुन भाषा, गणित व सामाजिक शास्त्रातील बुध्दीमत्तेची पातळी ठरवण्यात आली आहे. त्यानुसार पुढील शिक्षण पध्दतीचे नियोजनही शिक्षण विभागाला करावे लागणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी विविध संकल्पना राबवून गुणवत्ता वाढीसाठी विशेष उपक्रम राबविले आहेत. त्याचा फायदा न्यास परीक्षेत सहभागी विद्यार्थ्यांना झाल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात
आले.