विलवडेतील रिक्षा चालकाने चोरट्याला पकडून दिले पोलिस ठाण्यात

विलवडे रेल्वे स्टेशन येथून पलायन करणारा चोरटा रिक्षा व्यावसायिक सूर्यकांत कानसे यांच्या प्रसंगावधानामुळे पोलिसांच्या ताब्यात गेला. गुरुवारी 26 मे रोजी सकाळी विलवडे रेल्वे स्टेशन या ठिकाणी ही घटना घडली. रिक्षा चालकाच्या हुशारीचे तालुक्यातून कौतुक होत आहे.
रेल्वेमध्ये चोरी करणारा चोरटा गुरुवारी सकाळी विलवडे रेल्वे स्टेशन या ठिकाणी उतरला होता. याबाबतची माहिती रत्नागिरी पोलिसांनी विलवडे रेल्वे स्टेशन प्रमुख यांना दिली होती. त्यानुसार स्टेशन प्रमुख जाधव यांनी सदर चोरट्याला बसवून ठेवले होते. मात्र लघवीला जायचे, असे कारण सांगून तो रेल्वेच्या बाथरुममध्ये गेला. तेथून त्याने पलायन केले. त्यानंतर रेल्वे स्टेशन या ठिकाणी बाहेर उभ्या असलेल्या रिक्षामध्ये जाऊन बसला. आपल्याला लांजाला जायचे आहे, असे त्याने रिक्षा व्यावसायिक सूर्यकांत कानसे यांना सांगितले. चोरट्याला घेऊन लांजाकडे जात असताना त्यांना काही अंतरावर सहकारी रिक्षा व्यावसायिक तसेच रेल्वे स्टेशनचे स्थानक प्रमुख श्री. जाधव यांचा कॉल आला. “रिक्षातून जाणारा व्यक्ती ही चोर आहे. त्या चोरट्याला तुम्ही परत घेऊन या” असे सांगितले. मात्र रिक्षा परत वळविल्यास या चोरट्याला संशय येईल आणि तो पळून जाईल, अशी शक्यता असल्याने रिक्षाचालक कानसे यांनी प्रसंगावधान राखून आपली रिक्षा पुन्हा मागे न वळवता ती थेट लांजा पोलिस ठाण्यात आणली. तत्पूर्वी कॉल करून त्यांनी आपल्या लांजा येथील मित्रांना याबाबतची माहिती दिली होती.
लांजा पोलिस ठाणे येथे आल्यानंतर संबंधित चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. अशाप्रकारे रिक्षा व्यवसायिक सूर्यकांत कानसे यांच्या प्रसंगावधान आणि सावधगिरीमुळे एक अट्टल चोरटा हा लांजा पोलिसांच्या ताब्यात अडकला आहेे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button