ऐन गर्दीच्या हंगामात राजापुरातील विकासकामांना सुरूवात केल्याने नागरिकांना त्रास

राजापूर : शहरातील तालीमखाना ते जवाहर चौक या मुख्य रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली. मात्र ऐन उन्हाळी सुट्टीत गर्दीच्या हंगामात हे काम हाती घेण्यात आल्याने शहरासह ग्रामीण भागातून शहरात येणार्‍या सामान्य जनतेची मात्र फरपट होत आहे. या रस्त्यात असलेल्या पाणीपुरवठा वाहिनीचे कामही रस्ता दुरूस्तीत हाती घेण्यात आल्याने ऐन पाणीटंचाईत या वाहिनीवर अवलंबून असलेल्या नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत  आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर सुरू केलेले हे मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम होणार की नाही याबाबतही साशंकता व्यक्त होत आहे. तब्बल तीन ते चार वर्षे शहरातील मुख्य रस्त्यासाठी एक कोटीचा निधी मंजूर झाला, असे सांगितले जात होते, अखेर हा निधी मंजूर झाला व या कामाची निविदा काढून कामाचा शुभारंभही करण्यात आला. सुमारे एक कोटी रूपये खर्चाचे हे रस्ता डांबरीकरणाचे काम आहे. मात्र सदरचे काम हे संबंधित ठेकेदाराला काम करण्याचे आदेश देऊनही त्यांनी उशिरा सुरू केले आहे. त्यामुळे याचा फटका सर्वसामान्य जनता, नागरिक, व्यापारी आणि प्रवाशांना आता बसत आहे. यापूर्वी छत्रपती शिवाजी पथ ते बंदरधक्का रोडचे काम करण्यात आल्याने तब्बल दोन महिने तो रस्ता बंद होता. त्यामुळे  गैरसोय झाली. तर आता मे महिन्याच्या सुट्टीच्या आणि गर्दीच्या हंगामातच या मुख्य रस्त्याचे काम सुरू करून या मार्गावरील एसटी वाहतूक बंद ठेवण्यात आल्याने प्रवाशांची आणखी गैरसोय झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button