
शंभर रूपयांत रेशन कीट मिळणार तरी कधी?
रत्नागिरी : राज्यात शासनाकडून रेशनचे अन्नधान्य कीट वाटले जात असताना रत्नागिरी जिल्ह्यातील रेशन दुकानांवर अद्याप हे कीट पोहोचलेले नाही. काही तालुक्यांमध्ये दोनच वस्तू उपलब्ध झाल्याने दुकानदारांनी सर्व कीट आल्यावरच माल उतरवून घेतला जाईल, असे पत्र रेशन संघटनेच्यावतीने प्रशासनाला देण्यात आले आहे. राज्य शासनाने गरीब कुटुंबातील लोकांसाठी दिवाळी गोड करण्यासाठी एकत्र चार वस्तू असलेले कीट 100 रुपयांत देण्याचे जाहीर केले होते. त्यामध्ये एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर आणि एक लिटर पामतेलाचा समावेश आहे. या वस्तू एकत्र येत नसल्यामुळे दुकानदारांचीही गोची झाली आहे. दरम्यान काही तालुक्यांमध्ये साखर आणि तेल या दोनच वस्तू पोहोचल्या असून, त्याही उतरवून घेण्यास रेशन दुकानदारांनी नकार दिला आहे. सर्व वस्तू एकत्र देण्यात याव्यात, त्यामुळे वितरणास सुलभ होईल, असे रेशन दुकानदार सांगत आहेत.