शिक्षक बदल्यांची प्रक्रिया दोन वर्षांनंतर सुरू
रत्नागिरी : कोरोनामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात जिल्हा बदली पात्र शिक्षकांची नावे, मोबाईल नंबर, मेल आयडी, आधार क्रमांक यासह अन्य आवश्यक माहिती अपडेट केली असून ती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने राज्याच्या ग्रामविकास विभागाला सादर केली आहे.प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया राबवण्यासाठी मार्च महिन्यात ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली होती. या बैठकीला ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजीव कुमार , उपसचिव प्रवीण जैन, के. जी. वळवी. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बैठकीत शिक्षकांच्या बदल्यासाठी यू डायसनुसार शाळा व शिक्षकांची माहिती अद्ययावत करणे, अवघड क्षेत्रातील शाळा निश्चित करणे, न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षकांच्या नेमणुका करणे आदी विषयाच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार शिक्षकांची आवश्यक माहिती राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडे सादर केली आहे.