
सौंदळ येथील तरुणाने 108 दिवसांत नर्मदा नदीला मारली फेरी
राजापूर तालुक्यातील सौंदळ येथील श्रीकांत चव्हाण यांनी एकशे आठ दिवसांत नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. ही परिक्रमा पूर्ण करून नुकतेच ते आपल्या गावी परतले आहेत. चव्हाण यांनी 3500 किलोमीटर पेक्षा जास्त पायी परिक्रमा करून सर्व धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. ते म्हणाले की, तब्बल चार महिने कुटुंबाला सोडून नर्मदामाईला भेटायला आलो होतो. एकदा चालायला सुरुवात केल्यावर मागे वळून पाहायचेच नाही, असा निश्चयच केला होता. एक एक दिवस पुढे सरकत होता. सुरुवातीला तळपायाला फोड आले. पण रोजच 30 कि.मी. चालणे अपरिहार्यच होते. रात्रीची जागा मिळेल तिथे, मंदिरात, उघड्यावर, पारावर झोप घेऊन ही परिक्रमा पूर्ण केली. निसर्गसौंदर्य, शेती, ताजी फळं, ताज्या भाज्या या सर्वाचा परिक्रमेदरम्यान आनंद घेता आल्याचेही त्यांनी सांगितले.
…असे आहे नर्मदा परिक्रमेचे महत्त्व
नर्मदेच्या काठाकाठाने केलेली गोल प्रदक्षिणा म्हणजेच नर्मदा परिक्रमा. श्री काशी क्षेत्राची पंचकोस, तर अयोध्या-मथुरा यांची चौर्याऐंशी कोस. नैमिपारण्य- जनकपुरी या सर्वांहून मोठी परिक्रमा म्हणजे नर्मदा नदीची परिक्रमा सुमारे तीन हजार 500 कि.मी. (1780 मैल) आहे. सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ नदी म्हणून गंगेचे महत्त्व असले तरी फक्त नर्मदा नदीचीच परिक्रमा होते. कारण ती दक्षिण व उत्तर तटावरून गोलाकार वाहते. नदी जशी वाहते तशी तिच्या काठाने केलेली गोल प्रदक्षिणा म्हणजे नर्मदा परिक्रमा. प्रथम ही परिक्रमा श्री मार्कंडेय ऋषीमुनींनी अतिशय खडतर तप म्हणून पूर्ण केली. त्यामुळे तिला अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे सांगितले जाते.