
लोटे औदयोगिक वसाहत पुन्हा स्फोटांनी हादरली
खेड :खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहत पुन्हा एकदा जबरदस्त स्फोटांनी हादरली आहे. रविवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास येथिल प्रिवी ऑर्गानिक्स लिमिटेड या कंपनीच्या सॉल्व्हन्टचे ड्रम ठेवल्या गोडऊनमध्ये आग लागल्यानंतर झालेल्या सहा ते सात स्फोटांनी पूर्ण औद्योगिक परिसर हादरून गेला. या दुर्घटनेत जीवित हानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी झाली आहे. लोटे औद्योगिक वसाहतीत गेल्या वर्षभरात २० हुन अधिक जीवघेणे अपघात झालेले असल्याने या वसाहतीत सुरक्षेबाबत येथील कारखानदारांचा किती निष्काळजीपणा आहे हे स्पष्ट होत आहे.
घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार लोटे औद्योगिक वसाहतीतील प्लॉट क्रमांक १७ वर असलेल्या प्रिव्ही ओर्गानिक्स लिमिटेड या कंपनीच्या एका प्लांटमध्ये पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास आग लागली. रात्रपाळीच्या एका कामगाराच्या लक्षात ही बाब येताच त्याने बाहेर येऊन सुरक्षा यंत्रणेला अलर्ट केले. सुरक्षारक्षक अंतर्गत अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करेपर्यंत लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले आणि ज्या ठिकाणी ज्वलनशील रसायनाचे ड्रम ठेवण्यात आले होते त्या गोडावूनला आगीने घेरले. गोडाऊनमध्ये आग झपाट्याने पसरली आणि रसायन भरलेल्या ड्रमच्या स्फोटांनी लोटे औद्योगिक परिसर हादरून गेला. या कंपनीच्या बाजूला सीएएनजी पंप असल्याने भीती आणखीनच वाढली.
प्रिव्ही कंपनीत आग लागली असल्याची खबर लोटे औद्योगिक वसाहत अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तो पर्यंत कंपनीतील अंतर्गत अग्निशमन यंत्रणेने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु केले होते. अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचताच त्यांनी फोमच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु केले. दरम्यान आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ, कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारीही मदतीला आले. पहाटे ५. ३० वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळाव्यात अग्निशमन दलाला यश आले. या आगीत एक कामगार किरकोळ जखमी झाला असून त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची प्रार्थमिक माहिती उपलब्ध झाली आहे.
या दुर्घटनेची खबर मिळताच खेड पोलिसही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस आता या दुर्घटनेचा तपास करत आहेत. लोटे औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखान्यांमध्ये आग लागणे, स्फोट होणे, अशा दुर्घटना सातत्याने घडत असल्याने ही औद्योगीकी वसाहत येथे काम करणारे कामगार आणि आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांसाठी दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालली आहे. येथील कारखानदारांच्या निष्काळजीपणामुळे परिसराईतील नागरिकांना वायू, जल प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतोच आहे. सोनं पिकवणारी जमीन प्रदूषणामुळे नापीक झाली आहे. आंबा, काजू ही पिकं नष्ट झाली आहेत. केवळ नाइलाजास्तव परिसरातील ग्रामस्थ प्रदूषणाचा त्रास सहन करत आहेत आता येथील कारखानदार सुरक्षेच्या दृष्टीनेही आवश्यक ती खबरदारी घेत नसल्याने या औद्योगिक वसाहतीत काम करणारे कामगार आणि आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ यांसाठी ही वसाहत मृत्यूचा सापळा बनत चालली आहे. त्यामुळे सुरक्षेची आवश्यक ती उपाय योजना न करताच उत्पादन घेणाऱ्या रासायनिक कारखान्यांवर संबंधित शासकीय यंत्रणेने कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
www.konkantoday.com
