‘लिम्का विक्रमवीर’ प्रसन्न कांबळी यांचीदहा हजार शब्दकोड्यांची वाटचाल पूर्ण
रत्नागिरी/- दहा हजार चौकोनांचे शब्दकोडे बनवल्याबद्दल ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झालेले विक्रमवीर प्रसन्न कांबळी यांनी तयार केलेल्या कोड्यांनी दहा हजार ही संख्या गाठली आहे. गेली सत्तावीस वर्षे ते शब्दकोडी तयार करत असून रत्नागिरी जिल्ह्यातील जवळजवळ सर्व दैनिके आणि सप्ताहिकांमधून त्यांनी रचलेली शब्दकोडी प्रसिद्ध झाली आहेत. शासकीय अधिकारी पदाची जबाबदारी सांभाळून ही शब्दकोडी तयार करणारे कांबळी यांनी विशिष्ट विषयावर कोडे तयार करणे (जसे- गणपती), पांच मिनिटांत कोडे बनविणे, एकाला एक जोडून महाशब्दकोडे होईल अशी अनेक कोडी रचणे अशा शब्दकोड्यांच्या रचनेत प्रावीण्य मिळविले आहे.
अद्याप पर्यंत एकूण दहा हजार शब्द कोडी पूर्ण झाली आहेत, त्यानिमित्ताने आपल्या शब्दकोडी तयार करण्याच्या वाटचालीबद्दल प्रसन्न कांबळी यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दहा हजार चौकोनांचे एक भव्य शब्दकोडे तयार केल्यामुळे ‘लिम्का बुक आणि इंडिया बुक’मध्ये त्यांच्या विक्रमाची नोंद करण्यात आली. भविष्यात प्रथम ‘एशिया बुक’ आणि नंतर ‘गिनीज बुक’ सर करण्याचा मानस प्रसन्न कांबळी यांनी बोलून दाखवला. आता आणखी मोठे शब्दकोडे तयार केले आहे. आता २५० चौकोन असलेले अतिभव्य शब्दकोडे त्यांनी तयार केले आहे. इतक्या शब्दांचे कोडे अद्याप दुसऱ्या कोणी बनविले नसल्याचा त्यांचा दावा असून आपल्या या नव्या विक्रमाची ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद करण्यात यावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
रत्नागिरीतून प्रसिद्ध होणाऱ्या अनेक दैनिके आणि साप्ताहिकांना शब्दकोडी पुरविणारे प्रसन्न रंगनाथ कांबळी
प्रसन्न रंगनाथ कांबळी यांच्या घराण्याचे मूळ गाव वेंगुर्ले तालुक्यातील आरवली. दापोली तालुक्यातील केळशी येथे त्यांचा जन्म झाला. ‘महाराष्ट्र कृषी उद्योग मर्यादित’ या शासनाच्या अंगीकृत उद्योगात वरिष्ठ अधिकारी म्हणून ते अनेक वर्षे रत्नागिरीत कार्यरत होते, निवृत्त झाल्यावर त्यांचे ठाणे येथे वास्तव्य असते. रत्नागिरीतील वास्तव्यात शब्दकोडी तयार करणे, उकडीचे मोदक बनविणे, रांगोळी काढणे आणि मोफत विवाह मेळावे आयोजित करणे इत्यादी उपक्रमांमुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता लाभली.
प्रसन्न कांबळी यांनी सन १९९५ पासून मराठी शब्दकोडी करून वृत्तपत्रांत देण्यास सुरूवात केली. ‘दै.रत्नागिरी एक्स्प्रेस’च्या प्रकाशक सौ.नमिता कीर यांनी त्यांना प्रोत्साहन दिले. याच वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक बाळ भिसे यांच्या सहकार्याने या उपक्रमाला नियमितपणा आला. त्यानंतर ‘दै.रत्नागिरी टाइम्स’, ‘दै.भैरव टाईम्स’, ‘दै.तरूण भारत’, ‘दै.कोकण गर्जना’, ‘दै.रत्नागिरी समाचार’, ‘दै.प्रहार’, ‘दै.पुष्पराज’, ‘साप्ताहिक बलवंत’, ‘पाक्षिक रंगयात्री’, सांगली येथून प्रसिद्ध होणारे ‘नियती वेध’,(संपादक:हामजा मुल्ला), ‘दै.रत्नागिरी टाइम्स’ची पुरवणी, ‘दै.तरूण भारत’ची पुरवणी, श्री.पालकर यांचे गणपती विशेषांक, श्री.मालगुंडकर यांचा दिवाळी विशेषांक, इत्यादी दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, पुरवण्याना शब्दकोडी पुरवून ती प्रसिद्ध झाली आहेत, अनेक वेळा, एकाच वेळी दोन दोन दैनिकांना शब्द कोडी देऊन ती प्रसिद्ध देखील झाली आहेत.
उकडीचे मोदक करण्यात तरबेज असलेले श्री. कांबळी यांनी श्री गणेशाचे बेचाळीस लाख जप केले आहेत. गेल्या सव्वीस वर्षांची अविरत तपस्या, हे माझ्या यशाचे गमक आहे, असे म्हणून ‘चौदा विद्या आणि चौसष्ठ कलांचा अधिपती श्रीगणेश, श्रीदेव वेतोबा, कुलस्वामिनी म्हाळसाई माता, आपले दिवंगत आई वडील यांच्या आशीर्वादाने आणि आपली अर्धांगिनी सौ.मयूरी यांच्या सहकार्याने हे यश मी खेचून आणले, असे त्यांनी सांगितले.
www.konkantoday.com