ग्रामदेवीचे दर्शन घेतल्यानंतर दहा मिनिटातच त्याने सोडला प्राण

राजापूर : मागील दोन वर्षे आजारी असतानाही गावच्या शिमग्याच्या ओढीने तो हट्ट करून गावी आला… घरात आलेल्या पालखीचे दर्शन घेतले आणि पालखी घरातून गेल्यानंतर अवघ्या काही क्षणातच त्याने जगाचा निरोप घेतला… ही दुर्दैवी घटना घडली ती राजापूर तालुक्यातील सोल्ये येथील नीलेश शिवराम चौकेकर या अवघ्या 20 वर्षीय तरूणाच्या बाबतीत. तालुक्यातील सोल्ये माळवाडी येथील शिवराम चौकेकर यांचे दोन वर्षांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले. वडिलांच्या निधनाचा मानसिक धक्का नीलेश याला बसला आणि त्या दिवसापासून तो आजारी पडला. मुंबईला अनेक तपासण्या करण्यात आल्या मात्र आजार कोणता याचे निदान झालेले नाही. या स्थितीत हा तरूण गावच्या शिमगोत्सवासाठी आवडीने आला. सोल्ये गावच्या पालखीचे व देवीचे दर्शन या तरुणाने घेतले. घरातील मंडळींनी हौसेने देवीची पूजा करीत ओटी भरली. गावकर्‍यांशी हसत खेळत असताना पालखी शेजारी असलेल्या घरी गेली. याचवेळी नीलेश याचा रक्तदाब अचानक कमी झाला आणि त्यामध्येच त्याचा मृत्यू झाला. नीलेशच्या मृत्यूची बातमी शिमग्यातील खेळगडी व गावात पसरताच गाव सुन्न झाला. दहा मिनिटांपूर्वी देवीचे दर्शन घेणार्‍या नीलेशचा अचानक मृत्यू झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button