
विद्युतीकरण पूर्ण झालेल्या कोकण रेल्वे मार्गावरील अंतिम टप्प्यातील मार्गाची सीआरएस तपासणी दि. २२ व २४ मार्च रोजी
रत्नागिरी ते वेर्णा या विद्युतीकरण पूर्ण झालेल्या कोकण रेल्वे मार्गावरील अंतिम टप्प्यातील मार्गाची सीआरएस तपासणी दि. २२ व २४ मार्च रोजी करण्यात येणार आहे.गेली सहा- सात वर्षे कोकण रेल्वेचे विद्युतीकरणाचे काम सुरु होते. अखेर हे काम पूर्ण झाले असून कोकण रेल्वेचे प्रदूषणमुक्त रेल्वे प्रवासाचे पर्व सुरु होणार आहे.
गेल्याच महिन्यात मडगाव- कारवार आणि मडगाव – थिवी मार्गांवर विद्युतीकरणाची रेल्वे सुरक्षा आयुक्त (CRS) मनोज अरोरा यांनी तपासणी केली होती. त्याआधी कारवार – ठोकूर तसेच रोहा – रत्नागिरी विद्युतीकरण टप्पे पूर्ण होऊन सीआरएस निरीक्षण देखील पूर्ण झाले आहे. मुंबईपासून रत्नागिरीपर्यंतचा सलग मार्ग विद्युतीकृत असल्याने सध्या डाऊन दिशेला रत्नागिरीपर्यंत मालगाड्या तसेच दिवा- रत्नागिरी पॅसेंजर गाडी विद्युत इंजिनसह चालवली जात आहे.
कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गापैकी रत्नागिरी ते वेर्णा या अंतिम टप्प्यातील विद्युतीकरणाचे कामही पूर्ण झाल्याने या मार्गाची रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांच्याकडून २२ व २४ रोजी तपासणी केली जाणार आहे. यासाठी सात कोचसह सीआरएस स्पेशल ट्रेन २१ मार्च रोजी रात्री ११ वाजता सीएसटीहून कोकण रेल्वे मार्गांवर येण्यासाठी रवाना होईल.
www.konkantoday.com