
दोन वर्ष जनसेवेची, ‘महाविकास’ आघाडीची,जिल्ह्यात लोककलापथकांच्या माध्यमातून उद्यापासून होणार विकासकामांचा जागर
रत्नागिरी, दि. 08 – राज्यातील महाविकास आघाडी शासनाला नुकतीच दोन वर्ष पूर्ण झाली असून त्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये लोककलेच्या माध्यमातून व्यापक जनजागृती केली जाणार असून यासाठी शासनमान्य यादीवरील लोककला पथकांमधील तीन पथकांची निवड करण्यात आली आहे.
‘दोन वर्ष जनसेवेची, ‘महाविकास’ आघाडीची’ या घोषवाक्यासह जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या रत्नागिरी जिल्हा माहिती कार्यालयामार्फत व्यापक जनजागृती केली जाणार आहे.
गेल्या दोन वर्षात महाविकास आघाडी शासनाने केलेली कामे, राबविलेल्या योजना यांची माहिती जनतेला व्हावीत, यासाठी लोककलेच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातीलच कलाकारांना यासाठी संधी देण्यात आली आहे. याद्वारे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील वेगवेगळ्या गावांमध्ये विविध लोककलापथकांच्या माध्यमातून विकासाचा जागर होणार आहे. उद्या, 9 मार्च 2022 पासून ही मोहीम सुरू होणार आहे.
जिल्ह्यातील 63 गावांमध्ये लोककला पथकांच्या कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे. त्यात जिल्हा मुख्यालयाचे गर्दीचे ठिकाण, तालुका मुख्यालयाचे गर्दीचे ठिकाण, कृषी उत्पन्न बाजार समित्या, गाव जत्रा, आठवडे बाजार, उपजिल्हा रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रे, रेल्वे स्थानकांच्या बाहेरचा परिसर अशा ठिकाणी हे कार्यक्रम होणार आहेत.
या कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून शासनाच्या योजनांविषयी माहिती घ्यावी तसेच या लोककलाकारांचा उत्साह द्विगुणीत करावा, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
00000