
जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
रत्नागिरी दि. ८ :- महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरीच्या वतीने आज स्वयंवर मंगल कार्यालय, माळनाका, रत्नागिरी येथे खासदार विनायक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आज जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष उदय बने, जिल्हाधिकारी डॉ.बी. एन. पाटील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदूराणी जाखड, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, समाजकल्याण सभापती परशुराम कदम,महिला व बाल कल्याण सभापती भारती सरवणकर, विलास चाळके आदि मान्यंवर यावेळी उपस्थित होते.
खासदार विनायक राऊत म्हणाले की नारी शक्तीचा सन्मान करावा यासाठी 08 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. देश, राज्य, जिल्हास्तरावर महिलांनी आपले कतृत्व सिध्द करुन दाखविले आहे. आपण कुठेही कमी पडणार नाही हे त्यांनी समाजाला दाखवून दिले आहे. जिल्हयात ६० टक्के पेक्षा महिला आज गावाची सरपंच म्हणून आपली जबाबदारी पार पाडत आहे. तिवरे धरणफुटीच्या वेळीही पाटबंधारे विभागाच्या श्रीमती नारकर यांनी केलेल्या कामाचे त्यांनी यावेळी कौतुक केले. जागतिक महिला दिनानिमित्त त्यांनी सर्व महिलांना शुभच्छा दिल्या.
जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील म्हणाले आज प्रत्येक क्षेत्रात महिलांनी स्वत:ला सिध्द केले आहे. एक सुशिक्षीत महिला संपूर्ण कुटुंबाला , समाजाला सांस्कृतिक वारसा देत असते. एक एक विचारांची बैठक देत असते. आपल्या जिल्ह्याला, राज्याला, देशाला उच्चस्तरावर नेण्यासाठी महिलांचा सहभाग, त्यांचा योगदान महत्वाचा आहे असे ते म्हणाले .
आज आपण आपल्या आईमुळे येथे आहे. तिच्यामुळे आज जिल्हाधिकारी आहे, असे गौरव उद्गारही त्यांनी आई बद्दल यावेळी काढले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते वेगवेगळया क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्यां महिलांना सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हापरिषद मधील विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.