
राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी जिल्हा पाेलिस दलाचे कौतुक केले
भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे या मूळ गावी प्रथमच आलेल्या देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या दौरा रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी यशस्वी केला आहे. जिल्ह्यातील सर्वात दुर्गम असलेल्या मंडणगड तालुक्यात सोयीसुविधा तंत्रज्ञानाचा अभाव असतानाही पोलीस दलाने आधुनिक तंत्रज्ञानाचा आधारे समन्वय साधून दौरा यशस्वी केला. जिल्ह्यात प्रथमच आलेल्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या दौर्याचे योग्य व नीटनेटके नियोजन केल्याबद्दल राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ.मोहितकुमार गर्ग यांच्यासह पोलीस दलाचे कौतुक केले.
मंडणगड तालुका दुर्गम भागात वसलेला आहे. तेथे पुरेशा मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. दळणवळणांच्या साधनांसह आधुनिक तत्रज्ञान विकसित झालेले नाही. अश्या स्थितीत देशाचे राष्ट्रपती मंडणगड तालुक्यातील आंबडवे गावी येणार असल्याने त्यांच्या दौर्याची नियोजन करण्याची आव्हानात्मक जबाबदारी जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ.मोहितकुमार गर्ग व त्यांच्या टीमवर होती. राष्ट्रपतींसारख्या अतिमहत्व्याच्या व्यक्तीला असलेली सुरक्षा व त्या दृष्टीने करावयाचे नियोजन हे जिल्हा पोलीस दलातील सर्वांनाच नविन होते, पंरतु पोलीस अधीक्षक डाॅ. गर्ग यांनी ही आव्हानात्मक जबाबदारी स्वत:च्या अंगावर घेत पोलीस अधिकारी, अंमलदार, तांत्रिक टिम यांना सोबत घेऊन यशस्वी केली आहे हे राष्ट्रपती महोदयांचा दौर्यानंतर स्पष्ट झाले आहे.
मंडणगड तालुक्याचा नियोजनबध्द अभ्यास केल्यानंतर डाॅ. गर्ग यांनी मंडणगड तालुक्यात आपला मुक्काम ठोकला होता. जिल्हा पोलीस दलातील अधिकारी , अंमलदारांसह, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, नवी मुंबई येथील अधिकारी, अंमलदार यांना या दौर्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. सुमारे १००० पेक्षा अधिक पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांची मेहनत हेच दौऱ्याच्या यशस्वितेचे गमक होते. जिल्ह्यात उपलब्ध झालेल्या अधिकारी, अंमलदार यांच्या मदतीने बंदोबस्ताचे पाॅईंट निश्चित करण्यात आले होते. आंबडवे गाव ते हेलिपॅड हे अंतर २२ किलोमीटर अंतराचे असल्याने या भागात रस्त्याचा दुतर्फा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विविध ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले होते. तसेच कार्यक्रम स्थळासह आंबडवे गावाच्या पंचक्रोशीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस पथके तैनात होती. मंडणगड तालुक्याला खाडयांची किनार असल्याने तेथेही स्पीड बोटींव्दारे गस्त ठेवण्यात आली होती. मंडणगड तालुक्यात मोबाईल कनेक्टिव्हिटी अपुरी असल्याने वायरलेस सिस्टीमव्दारे बंदोबस्ताची तयारी करण्यात आली होती. त्यामुळे मंडणगड येथे उभारण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाव्दारे सर्व पाॅईंटवर लक्ष ठेवून त्यांना नियंत्रित करणे शक्य झाले. राष्ट्रपती महोदयांचा आगमनापूर्वी दोन वेळा घेण्यात आलेल्या रंगीत तालीमीमध्ये आढळलेल्या त्रुटी तत्काळ दूर करुन दुरस्त करण्यात आल्या. बंंदोबस्त दरम्यान छोटया-छोटया बारकाव्यांचा अभ्यास करण्यात आला होता. राष्ट्रपती महोदयांचा ताफा ज्या मार्गावरुन जाणार होता तो मार्ग खुल्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होत, तसे आदेशही पोलीस अधीक्षक डॉ. गर्ग यांनी काढले होते. तर अधिकारी, अंमलदार यांना नेमून दिलेल्या फिक्स पाॅईंटवर ते हजर आहेत याची तपासणी बिनतारी यंत्रणेमार्फत सुरु होती.
कार्यक्रम ठिकाणी, मंडणगड मधील मुख्य रस्त्यावर आणि कार्यक्रम स्थळी CCTV कॅमेरे बसविण्यात आले होते. राष्ट्रपती महोदय यांच्या सुरक्षिततेला अत्युच्च प्राधान्य देत सुरक्षा पास देण्यात आले होते. प्रशासनातील इतर विभागांशी योग्य समन्वय साधला गेल्याने दौरा पार पाडणे सुकर झाले.
डॉ. गर्ग यांनी स्वतः आंबडवे गावातील ग्रामस्थ यांच्याशी ३ वेळा बैठक घेऊन ते त्यांच्या सतत संपर्कात राहिले होते.
राष्ट्रपती महोदयांचा सुरक्षेत कोणतीही त्रुटी राहणार नाही यासाठी जिल्हा पोलीस दल, जिल्हा प्रशासन, होमगार्ड, बाॅम्ब शोधक पथक, डाॅग स्काॅड, राज्य राखीव दलाचा तुकडया, दंगा काबू पथक आदी यंत्रणा मंडणगडसह आंबडवे येथे उपलब्ध करण्यात आल्या होत्या. जिल्ह्यात प्रथमच झालेल्या राष्ट्रपती महोदयांचा दौरा जिल्हा पोलिसांनी सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही त्रुटी न ठेवता, योग्य नियोजन आणि अथक मेहनत घेऊन यशस्वी केला आहे.
बंदोबस्तानंतर पोलीस अधीक्षक डॉ. गर्ग यांनी बंदोबस्त मधील सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार या सर्वांचे अभिनंदन केले.