
निवळी – जयगड रस्त्याबाबत ना उदय सामंत यांनी घेतली बैठक….
निवळी -जयगड रस्त्यावरील अवजड आणि ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे या रस्त्याची दुरावस्था झाली होती आणि यामुळे या रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण देखील वाढले होते.
गणपतीपुळे या प्रसिद्ध पर्यटन स्थळाकडे जाणाऱ्या या मार्गावरून पर्यटकांना देखील प्रवास करणे त्रासदायक झाले होते.वाढते अपघात ,कंपन्यांच्या अवजड वाहतुकीमुळे रस्त्याची झालेली दुरावस्था याची नामदार उदय सामंत यांनी गांभीर्याने दखल घेतली आणि तातडीने यावर निर्णय घेण्यासाठी मुंबई येथे बैठक बोलावली.
आजच्या या बैठकीला विभागीय आयुक्त कोकण विलास पाटील,उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण,मुख्य बंदर अधिकारी कॅप्टन संजय शर्मा,अधीक्षक अभियंता सा बा छाया नाईक,प्रांत अधिकारी विकास सूर्यवंशी, JSW कंपनीचे एस एम पाटील,आंग्रे,चौघुले पोर्टचे कॅप्टन गुप्ता उपस्थित होते.
सदर बैठकी दरम्यान नामदार उदय सामंत यांनी या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या कंपन्याच्या अवजड वाहतुकीबाबत संबंधित शासकीय यंत्रणेने सखोल माहिती घेऊन या कंपन्यांची या बाबत असलेली भूमिका काय ती यंत्रणांनी तपासून,रस्त्यांच्या देखभालीसाठी कंपन्यांनी जबाबदारी झटकू नये या सूचना केल्या.
बैठकीमध्ये नामदार सामंत यांनी कंपन्यांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करून पावसाळ्यापूर्वी हा 42 किमी लांबीचा रस्ता सुस्थितीत करण्यासाठी JSW आणि चौगुले या दोन मोठ्या कंपन्यांची जबाबदारी राहील ही भूमिका स्पष्ट केली आणि या कंपन्यांनी पावसाळ्यापूर्वी सदर रस्ता सुस्थितीत करावा याबाबत सूचना केल्या
शासनाच्या संबंधित यंत्रणेने देखील या रस्त्याचे महत्व ओळखून आजच्या बैठकीतील या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी कंपन्यांकडून तातडीने कार्यवाही करून घेण्याच्या सूचना नामदार उदय सामंत यांनी केल्या.
या बैठकीला उपस्थित या कंपन्यांचे जबाबदार अधिकारी यांनी या बाबत सकारात्मक भूमिका दाखवली असून नामदार उदय सामंत याना लवकरच उपयोजना केली जाईल म्हणून शब्द दिला.