अश्रू : गोठलेले आणि गोठवलेले ! वाचा कथा लेख…….

              *- डॉ . श्रीकृष्ण जोशी*

                *।।  एक ।।*

( हा कथालेख सर्व एस . टी . कर्मचारी बांधवांना समर्पित ! )

  • एस . टी . सड्यावर येऊन थांबली .
    आणि घामाने प्रचंड भिजलेला ड्रायव्हर कसाबसा खाली उतरला .
    आणि रस्त्यातच मटकन बसला . एस टी च्या मागून चालत आल्याने दमल्याभगल्या कंडक्टरने , डोक्यावरचा जांभा दगड शेजारच्या झुडुपात फेकला आणि तो सुद्धा त्याच्या शेजारी येऊन बसला .

दोघेही घामानं चिंब भिजले होते .
दोघांचेही छातीचे भाते जोरजोरात हलत होते .
दोघांच्याही डोळ्यात रक्त पेटलेलं दिसत होतं .

पण दोघेही निःशब्द बसले होते .

सगळीकडे अंधार दाटला होता .
एसटीच्या मिणमिणत्या दिव्यात दोघांच्या सावल्या केविलवाण्या वाटत होत्या .

गाडी वस्तीची होती .
गाडीत मी एकटाच पॅसेंजर होतो .
मी हातातली चार्जिंगची मोठी बॅटरी घेऊन खाली उतरलो आणि त्या दोघांकडे आलो .

अजूनही दोघे न बोलता तसेच बसून होते .
अंगातला घाम , मनातला संताप आणि शरीराला झालेले श्रम थंडावण्याची वाट बघत .

  • एसटी वेळेवर सुटली होती .
    चाळीस पन्नास पॅसेंजर होते .
    आणि पहिल्याच चढावाला ड्रायव्हरच्या लक्षात आलं ,
    गाडीला पिकअप नाही .
    पण तरीही गिअरशी झटापट करीत तो गाडी चालवत होता .

त्याच्या पोटात गोळा उठला .
या लहानशा चढावाला ही अवस्था तर वस्तीच्या गावात शिरण्यापूर्वीच्या अवघड वळणावळणाच्या , एकावेळी जेमतेम एकच गाडी जाऊ शकेल अशा अरुंद कच्च्या रस्त्याला काय होईल ?

एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी अशी भयानक स्थिती असणाऱ्या रस्त्यात गाडीने स्पीड घेतलाच नाही तर काय होईल ?
या चाळीस पन्नास पॅसेंजर्सचं काय होईल ?
जेमतेम दुसऱ्या दिवशी पोहोचता येईल इतकंच डिझेल मिळालेलं असताना ऐनवेळी डिझेल संपलं तर काय होईल ?
पिकअप न घेतल्यानं गाडी पाठीपाठी जायला लागली तर पॅसेंजर्स किती बोंबलतील ?

त्याने हळूच खूण करून कंडक्टरला जवळ बोलावून सगळ्या गोष्टीची कल्पना दिली .
” एक काम करशील काय ? “
” करतो हजार कामं , बोल . “
” राईचा घाट सुरू झाला की मी गाडी थांबवतो , सगळ्यांना कल्पना देतो आणि तू खाली उतरून एक मोठा दगड घेऊन गाडीबरोबर चाल . गाडी थांबली आणि पाठीपाठी यायला लागली तर तो दगड टायरीखाली घाल . इतकंच आपल्या हातात आहे .”
कंडक्टर विचारात पडला आणि होकार दिला .
” आज आपला शिव्या खायचा दिवस आहे , चिडू नकोस. “
” अरे पण साडेतीन मैलांचा घाटरस्ता आहे . “
” मग मी तरी काय करू ? “

त्या दोघांचं बोलणं हळुहळू सगळ्यांपर्यंत पोहोचलं आणि एकच कालवा सुरू झाला .
आरडाओरडा , आयमाय वरून शिव्या , सगळ्यांचा उद्धार आणि पैसे परत मागण्यासाठी कडाक्याची भांडणं सुरू झाली .

त्यातले काही सूज्ञ होते . त्यांनी घाट लागण्यापूर्वी गाडी थांबवायला सांगितली आणि निमूटपणे चालायला लागले .
भांडण करून , शिव्या देऊन गाडी चालणार नाही हे लक्षात आल्यावर उरलेले खाली उतरले आणि चालू लागले .
शेवटी मी सुद्धा उठलो आणि दारापर्यंत आलो .
इतक्यात पाठून हाक आली .
” सर , तुमच्याजवळ चार्जिंगची बॅटरी असते ना , मग किमान तुम्ही तरी गाडीत थांबा . समजा गाडी बंद पडली , चालू झालीच नाही किंवा लाईट काम देईनासे झाले तर तुमच्या बॅटरीचा उपयोग होईल . उपकार होतील आमच्यावर . “

त्याचा केविलवाणा , हृदयद्रावक स्वर ऐकल्यावर माझ्या मनात गलबलून आले .
मी ड्रायव्हरजवळ आलो .
” थांबतो मी “
त्या दोघांचे डोळे आनंदाने लकाकले .

आणि मला एकदम शॉक बसला .
ड्रायव्हर ज्या सीटवर बसतो , तिथे केवळ चौकोनी लोखंडी पट्या होत्या आणि त्यावर जांभ्या दगडाचा चिरा ठेवून ड्रायव्हर गाडी चालवत होता .
पाठ टेकण्याच्या जागी अनेक चिंध्या एकाला एक जोडून तात्पुरती सीट बनवली होती .
मी पाहतोय हे ड्रायव्हरच्या लक्षात आलं .
तो कसनुसा हसला .
कंडक्टरसुद्धा ओशाळला .
आणि तो खाली उतरला .
एक दगड डोक्यावर घेतला आणि चालू लागला .
गाडी रडत रखडत , मागं पुढं जात कशीबशी पुढं जात होती .

बरोबरीचे सगळे पॅसेंजर एव्हाना पुढे गेले होते .
अंधार पडायला सुरुवात झाली होती .
सुदैवाने गाडीचे दिवे सुरू होते .

  • आणि कसाबसा घाट संपला .
    मी त्या दोघांजवळ गेलो .
    ” निघायचं ? “
    मी त्या दोघांना विचारलं .
    ” आणि जेवणाचं काय ? डबा आणला असेल ना ? “

उत्तर देण्याऐवजी दोघे उठले आणि केबिनमधले डबे घेऊन आले .माझ्यासमोरच उघडले .

दोघांच्याही डब्यात भाकरी होती , लसणीची चटणी होती आणि दोनचार लहानसे कांदे होते .
” कालपासून पुरवून पुरवून खातोय डबे .”
” म्हणजे ? “
” सर , तुमच्यासारखं जेवण नाही परवडत आम्हाला . घराबाहेर पडताना बायको चार दिवसांच्या भाकऱ्या भाजून देते . पण पोरांकडे बघितल्यावर त्यातल्या दोन भाकऱ्या काढून ठेवतो आम्ही आणि उरलेल्या पुरवून खातो .”
त्यांनी मान खाली घालून सांगितलं .
मला कसंतरीच झालं .
मी घरी फोन केला .
” दोघे पाहुणे येत आहेत माझ्याबरोबर , जास्तीचा स्वयंपाक करून ठेव .”
मी घरी सांगितलं
” आज माझ्या घरी तुम्ही जेवायला यायचं आहे .”

  • त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं .

” तुम्हाला कशाला त्रास ?”
” असू दे , माझ्या गावात तुम्ही येताय , इतकं तर केलंच पाहिजे आम्ही . मला कल्पना नव्हती , तुमच्या परिस्थितीची .”

दोघेही हसले .
मला चमत्कारिक वाटलं .
” काय झालं ? मी काही चुकीचं बोललो का ?”
” नाही सर , तुमचं काहीच चुकलं नाही . आमच्या परिस्थितीची तुम्हाला कल्पना कशी असेल ? काही तासांकरता पॅसेंजर्स आणि आम्ही एकत्र असतो . पॅसेंजरचं गाव आलं की तो उतरून निघून जातो . गरजेपुरता संवाद होतो . ओळख विसरली जाते .आम्हीसुद्धा ड्युटी लागेल तशी , मिळेल ती गाडी घेऊन सांगतील त्या गावाला जातो . आरामगाडी आहे की खटारा आहे हे आम्हालाही माहीत नसतं . मिळेल ती गाडी , मिळेल तेवढं डिझेल , भेटतील ते पॅसेंजर्स आणि येईल तो प्रसंग , यांना सामोरं जात नोकरी करतो . हां , आता पगार विचारू नका , संसार कसा चालतो ते विचारू नका , सणसमारंभात आम्ही कुटुंबाबरोबर असतो का ते विचारू नका , कर्जबाजारी किती आहोत ते विचारू नका , नोकरी टिकवण्यासाठी कुणाकुणाची बोलणी खातो , चूक नसताना शिव्या खातो ते का हे विचारू नका .रस्ते कसे आहेत , आम्ही त्यातून गाडी कशी चालवतो , बंद पडली तर वरिष्ठांची बोलणी कशी खातो , ते विचारू नका . वस्तीच्या गाडीला आम्हाला तीन रुपये भत्ता मिळत होता , त्याचं काय झालं ते विचारू नका , आम्ही व्यसनाधीन का होतो , आत्महत्या का करतो ते विचारु नका .मुलामुलींची शिक्षण , लग्नकार्य यातलं काही विचारू नका . आला दिवस कसा घालवतो हे विचारू नका . पगार वेळेवर होतो का हे विचारू नका . आमच्या शारीरिक आणि मानसिक यातना कधी संपतील हे विचारू नका . आमचं भविष्य कसं असेल , मृत्यू कसा असेल , लाल परीचं भवितव्य काय यातलं काही काही विचारू नका . आजचा क्षण आमचा इतकंच आम्हाला ठाऊक . आम्ही घरी जातो तो दिवस आमचा सणसमारंभाचा असतो , इतकंच माहीत आहे . आणि आता तर डोळ्यासमोर भयंकर अंधार आहे . ही एसटी हेच आमचे जग . उद्या सकाळी याल तेव्हा पुन्हा आम्ही हसतमुखाने स्वागत करू तुमचं . आजच्या यातना विसरून .तुमचं जग आणि आमचं जग वेगळं आहे . आम्हाला डिझेलच्या वासाशिवाय , गंजलेल्या फाटलेल्या सीटशिवाय झोपच येत नाही . तुमच्या शिव्या , वरिष्ठांची बोलणी खाल्याशिवाय पोट भरत नाही . टोचणाऱ्या सीटशिवाय सुख लाभत नाही . जरा वाईट बोललोय पण विषय निघाला म्हणून बोललो .हो आणखी एक आहे सर , आमची बाजू कुणी ऐकून घेत नाही . आमच्याबद्दल गैरसमजच भरपूर आहेत , त्यामुळं मोकळेपणानं बोललो . “

दोघेही उठले .
” चला , उशीर झाला .”
कंडक्टरने घंटा वाजवली आणि तेवढ्यात घंटेची दोरीच तुटली .

” असंच आमचं आयुष्य आहे .”

तो म्हणाला अन पुन्हा कसनुसा हसला . ड्रायव्हरने गिअर बदलला .

गाडी सुरू झाली .

माझं लक्ष त्या तुटलेल्या, घंटेच्या दोरीकडे वारंवार जात होतं .
आणि डोळ्यांतून अश्रू वहात होते .
अविरत !

– डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी .

९४२३८७५८०६

कथालेख आवडल्यास ,नावासह सर्वत्र पाठवायला हरकत नाही .
हा कथालेख समस्त एसटी कर्मचाऱ्यांना समर्पित असल्याने , सर्व एसटी कर्मचारी बांधवांपर्यंत पोहोचवायला हवा असे मला वाटते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button