गैरकारभाराबाबत जिल्हा शल्य चिकीत्सकांसह जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची अनिकेत पटवर्धन यांची मागणी

रत्नागिरी- जिल्हा शासकीय रुग्णालयात सावळा गोंधळ सुरू आहे. कोरोनामुळे पत्नी गमावली, पोर्टलवर डिस्चार्ज दिल्याचे दाखवले आहे. तसेच मृत्यू प्रमाणपत्र न दिल्यामुळे पतीने गोंधळ घातला. अशा अनागोंदी, गोंधळी कारभाराने रुग्णालयाचा पंचनामा झाला आहे. अशा अनेक गैरकारभाराबाबत जिल्हा शल्य चिकीत्सकांसह जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करून प्रशासन दुर्लक्ष करत आहे. जिल्हा रुग्णालयातील बेजबाबदार अधिकाऱ्यांचे निलंबन करावे आणि जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी रुग्णालय सुधारणेसाठी तत्काळ पावले उचलावीत, असे प्रतिपादन भारतीय जनता युवा मोर्चाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी केले.
जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराबाबत गेले दोन वर्षे अनेक गैरकारभाराचे विषय मी मांडले आहेत. जिल्हाधिकारी, जिल्हा प्रशासन आणि मंत्र्यांपर्यंतही हे सारे विषय गेले आहेत. परंतु भाजपने मांडलेल्या या सर्व मुद्द्यांकडे दुर्लक्ष करायचे, असे सत्ताधाऱ्यांचे धोरण ठरलेले दिसते. दोन दिवसांपूर्वी कोरोनाने पत्नी गमावलेल्या पतीची कैफियत समोर आली आहे. वृत्तपत्रांनी याची मोठी बातमीही केली होती. परंतु प्रशासन ढिम्म आहे. कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई व्हायला हवी.
कोरोनामुळे अनेकांचे नातेवाईक गेले. त्यांचे दुःख खूप मोठे आहे. परंतु मयत व्यक्तीच्या नातेवाईकांना पन्नास हजार रुपये मदत मिळत असल्यामुळे जणू काही मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार रुग्णालयात उघडकीस येत आहेत. हे पैसे मिळणार म्हणून तुम्ही जीवंत माणसालाही मयत दाखवणार काय, असा खडा सवाल अनिकेत पटवर्धन यांनी केला. मयत झालेल्यांची नावे नाहीत पण जीवंत असणाऱ्यांची नावेसुद्धा देऊन पन्नास हजार रुपये लाटले जात आहेत का, याबाबतचा खुलासा जिल्हा रुग्णालयाने करावा, अशी मागणी त्यांनी केली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button