
लसीकरणात राजकीय हस्तक्षेप थांबवा; लसीकरणाचा बाजारच मांडलाय- अनिकेत पटवर्धन यांचा आरोप
रत्नागिरी– सध्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणामध्ये ये रे माझ्या मागल्या प्रमाणेच राजकीय हस्तक्षेप सुरू आहे. जणू काही लसीकरणाचा बाजारच मांडला असून मंत्र्यांचाही या राजकीय पदाधिकाऱ्यांना वरदहस्त असल्याने ठरावीक जनतेलाच लस मिळत असल्याचा आरोप भारतीय जनता युवा मोर्चाचे द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी केला आहे. नूतन जिल्हाधिकारी डॉक्टर बी. एन. पाटील यांच्याकडून जनतेच्या बऱ्याच चांगल्या अपेक्षा आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी अशा प्रकारे अनधिकृत लसीकरण व राजकीय हस्तक्षेप थांबवावा, अशी मागणी पटवर्धन यांनी केली. डीपीडीसीच्या बैठकीसाठी पालकमंत्री अॅड. अनिल परब येणार आहेत, त्यांनी जातीनिशी लक्ष घालावे, अशी मागणीही त्यांनी केली.
यासंदर्भात त्यांनी पत्रकारांना सांगितले की, रत्नागिरीमध्ये यापूर्वी अनधिकृत लसीकरण शिबिर आयोजित केले होते. राजकीय पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या या शिबिरानंतर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची बदली करण्यात आल्याची चर्चा लोकांमध्ये सुरू झाली. आजही ठरावीक राजकीय पदाधिकारी टोकन पद्धतीने किंवा फोन करून ओळखीच्या लोकांना बोलावून लस देत आहेत. हा सारा प्रकार आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांना हरताळ फासणारा आहे. लसीकरणाची माहिती माध्यमांतून योग्य प्रकारे प्रसारित होत नाही. त्यामुळे लोक संतापले आहेत. या प्रकारात जिल्हाधिकारी डॉ. पाटील व नूतन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आठल्ये यांच्याकडून जनतेच्या माफक अपेक्षा आहेत.
टोकन देऊन कुठेही लसीकरण होत नाही, परंतु, रत्नागिरी जिल्ह्यात अशी प्रथा पाडण्यात आली आहे. याला मंत्र्यांचे पाठबळ आहे. डॉक्टर आठल्ये यांनी यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात कामकाज पाहिले आहे. त्यांना रत्नागिरीची राजकीय, सामाजिक स्थिती माहिती आहे. परंतु आता त्यांनी लसीकरणामध्ये लक्ष घालावे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येणार होते. परंतु ते का आले नाहीत, हे माहित नाही. परंतु ते आले असते तर लसीकरणाचा कार्यक्रम योग्य रितीने राबवला गेला असता. परंतु आता लसीकरणात गोंधळच सुरू आहे, लसीकरणाचा बाजार होत आहे, याकडे अनिकेत पटवर्धन यांनी लक्ष वेधले.
राजकीय दबावामुळे प्रशासन का झुकत आहे, आपण जनसेवक आहोत, त्यामुळे जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजेत, अशी सूचना अनिकेत पटवर्धन यांनी मांडली. आरटीपीसीआर टेस्टिंगची दुसरी लॅब रत्नागिरीत होणार होती, तिचे काय झाले?, ही घोषणा हवेत विरली आहे. कारण आता टेस्टची संख्या वाढवली तरी रिपोर्ट मिळायला ५ ते १० दिवस लागत आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी खुलासा करावा, अशी मागणी अनिकेत पटवर्धन यांनी केली.
18 ते 23 वयोगटातील तरुणांसाठी झालेल्या लसीकरण शिबिरासाठी रत्नागिरीतील काही प्रकल्पांनी सीएसआर फंड दिला. पण तो थेट लसीकरणाचा ठेका दिलेल्या हॉस्पीटलच्या नावे देण्यात आला होता. असे न करता जिल्हा प्रशासनाच्या नावे हा धनादेश देऊन तो संबंधित रुग्णालयाला देणे अपेक्षित होते, याकडे अनिकेत पटवर्धन यांनी लक्ष वेधले आणि जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत योग्य खुलासा करावा, असे सांगितले
www.konkantoday.com