कोकणचे लोकनेते श्री राजाभाऊ लिमये 89 व्या वर्षात पदार्पण

रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जेष्ठ पत्रकार श्री. वसंत विष्णू तथा राजाभाऊ लिमये दिनांक 21 जुलै 2024 रोजी 89व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देणाऱ्या या लोकनेत्याच्या कारकिर्दीवर टाकलेला हा ओझरता दृष्टिक्षेप.शालेय शिक्षणानंतर प्रशासकीय सेवेत आयएएस अधिकारी बनण्याची मनीषा बाळगून शिक्षणासाठी मुंबईत गेलेला हा धाडसी तरुण आपले परमपूज्य पिताश्री श्री. विष्णू माधव तथा बाळासाहेब लिमये यांच्या आजारपणामुळे सत्यशोधक परिवाराचा आणि लिमये कुटुंबाचा डोलारा सावरण्यासाठी काही दिवसातच रत्नागिरी परतला. लिमये कुटुंबाचा वारसा पुढे चालवण्यासाठी उच्च शिक्षणाची महत्त्वकांक्षा बाजूलाच ठेवावी लागली. राजाभाऊ लिमये यांनी रत्नागिरी येथील गोगटे कॉलेजात जुनियर बीए पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर कौटुंबिक जबाबदाऱ्यांबरोबरच साप्ताहिक सत्यशोधक आणि सत्यशोधक मुद्राणालयाची जबाबदारी शिरावर येऊन पडली. त्यामुळे त्याला शिक्षण अर्धवट सोडावे लागले.राजाभाऊंचे पिताश्री श्री. बाळासाहेब लिमये यांचे १९६१ मध्ये निधन झाले. त्यानंतर राजाभाऊ सत्यशोधक चे संपादक झाले. राजाभाऊंचे पिताश्री श्री बाळासाहेब हे काँग्रेस विचारांचे होते. त्या काळात तेथील काँग्रेस भवन काँग्रेसचे नेते आणि काँग्रेसच्या सभांसाठी सदैव उपलब्ध असे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांची लिमये कुटुंबाच्या घरी सदैव ये-जा सुरु असे. त्यावेळी तत्कालीन काँग्रेस नेते शामराव पेजे. प्रतापराव भोसले,हुसेन दलवाई अशी अनेक मंडळी राजाभाऊंच्या संपर्कात आली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या काळात काँग्रेसकडे कार्यकर्ते नव्हते. त्यावेळी शामराव पेजे आणि पिताश्री यांच्या आग्रहामुळे टिळक आळी जवळील काँग्रेस भवनात जाऊन बसण्याचे राजाभाऊंना संकेत दिले गेले आणि तेव्हापासून राजाभाऊंनी काँग्रेस पक्ष कार्यात सक्रिय सहभाग घेण्यास सुरुवात केली.राजाभाऊंनी १८७१ साली स्थापन झालेल्या सत्यशोधक साप्ताहिक आणि सप्तशोधक परिवाराची जबाबदारी जून १९६१ पासून स्वीकारली, ती पाच दशकांपेक्षा अधिक काळ मोठ्या जबाबदारीने सर्व आर्थिक अडचणींवर मात करून निष्ठेने पार पाडली. राजाभाऊंनी पक्ष संघटनेबरोबरच जिल्हा परिषद पावस आणि हरचेरी गटात सातत्याने निवडून येत विकास कामांचा धडाका लावला. विशेषता त्या काळात नळपाणी योजना, ग्राम विकासाकाच्या विविध योजनांबरोबरच त्यावेळी दुष्काळी काळात सुरू झालेली रोजगार हमी योजनेतून रस्ते विकासाची कामे या जिल्हा परिषद गटात मोठ्या प्रमाणात पूर्णत्वास नेऊन गाव तिथे रस्ता आणि गाव तेथे एसटी वाहतुकीचे जाळे निर्माण केले. राष्ट्रीय नेते श्री शरदराव पवार यांनी त्यांच्यावर रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविले आणि राजाभाऊ यानी पक्ष संघटनेचे काम जबाबदारी करतानाच जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची धुरा १९९२ ते १९९७ पर्यंत सलग पाच वर्षे यशस्वीपणे सांभाळली. या काळात ग्रामीण विकासाचा आलेख उंचावत जिल्हा परिषद कारकीर्दी मधील सर्वोत्कृष्ट कार्याची नोंद केली. या पाच वर्षाच्या काळात एकाही संघटनेकडून कसल्याही प्रकारची तक्रार व संप आंदोलनाची नोटीस दिली गेली नाही आणि राज्यातील उत्तम जिल्हा परिषद म्हणून महाराष्ट्रात रत्नागिरीचे नाव झाले.(२ वर )-२-राजाभाऊंच्या या कार्यकर्तृत्वाची नोंद राष्ट्रीय नेते शरदरावजी पवार यांनी आवर्जून घेतली आणि त्यांना केंद्रीय कृषिमंत्री असताना केंद्रीय नारळ विकास बोर्डावर काम करण्याची संधी दिली. जवळजवळ सलग दहा वर्षे त्यांनी या बोर्डावर केलेले काम संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झाले. दोन वेळा ते केंद्रीय नारळ बोर्डाचे उपाध्यक्षही झाले. कोकणात नारळ लागवडीचे नवे पर्व सुरू झाले आणि राजाभाऊंना कोकणचा कल्पवृक्ष म्हणून ओळखले जाऊ लागले.त्यानंतर शरदरावजी पवार यांनी त्यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई या संस्थेच्या कोकण विभागीय समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करून केंद्राचे विभागीय कार्यालय रत्नागिरी येथे सुरू करून दिले .सुमारे आठ वर्षाहून अधिक काळ त्यांनी यशंतराव प्रतिष्ठान संस्थेचे कार्य विविध उपक्रमांद्वारे ग्रामीण स्तरापर्यंत पोहोचविले. दापोली येथील बेलोसे एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी उत्तम काम केले. याखेरीज पत्रकारिता, मुद्रण संस्था, रिक्षा व्यावसायिकांचे संघटना अशा अनेक क्षेत्रात कार्यरत राहिल्याने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा विविध क्षेत्रात उमटला आणि त्यांचे हितचिंतक मोठ्या प्रमाणात निर्माण झाले.पत्रकारितेचा मूळ पिंड असलेल्या राजाभाऊंनी पोंभुर्ले तालुका देवगड या ठिकाणी फलटण येथील महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकाच्या विस्तार आणि विकासासाठी आपल्या माध्यमातून विविध संस्थांकडून आणि उद्योजकांकडून भरीव आर्थिक देणग्या मिळवून दिल्या आणि दरवर्षी सहा जानेवारी रोजी पोंभुर्ले येथे होणाऱ्या पत्रकार दिन कार्यक्रमाला न चुकता उपस्थिती आज ९० व्या वर्षी सुद्धा कायम ठेवली आहे. या पत्रकार दिनी राज्यातील पत्रकारांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल संस्थेमार्फत विविध पुरस्कार प्रदान केले जातात. त्यावेळी आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील गुणवंत पत्रकारांचीही न विसरता ते दरवर्षी शिफारस करीत असतात. जिल्ह्यातील अनेक गुणवंत पत्रकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्काराचे मानकरी ठरलेले आहेत.कार्यकर्त्यांचे प्रेम आणि असंख्य हितचकांच्या सदिच्छा, थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आणि कुटुंबीयातील सर्व घटकांचे उदंड प्रेम त्यांना मिळत आहे. आज राजाभाऊ सार्वजनिक क्षेत्रातील कार्यातून निवृत्त झाले असले तरी सर्वांशी सामंजस्य आणि एकोपा राखण्यात ते आपली हयात खर्च करीत आहेत. रत्नागिरीचे वैभव असलेल्या दानशूर भागोजी शेट कीर आणि त्यांचे गुरु संतश्रेष्ठ श्री गाडगेबाबा यांचे रत्नागिरी शहरात पूर्णाकृती पुतळे उभारले जावेत, यासाठी त्यांनी राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री.उदयजी सामंत यांच्याकडे प्रस्ताव मांडला आणि त्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसादही दिला आहे. त्यांचे हे स्वप्नही लवकरच साकार होणार आहे. अशा या आमच्या लोकनेत्याला भावी आयुष्यात उत्तम आयुरारोग्य लाभो आणि आणि ते शतायुषी होवोत,अशा सदिच्छांसह 89 व्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिष्टचिंतन.*प्रभाकर कासेकर**निवृत्त माहिती अधिकारी*मो. ९४२२०५४०३४

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button