
‘हर घर तिरंगा’ ही पंतप्रधानांची संकल्पना सर्वांपर्यंत पोहोचवावी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे रत्नागिरीत प्रतिपादन
रत्नागिरी : ‘हर घर तिरंगा’ हे अभियान समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावे ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या औचित्याने हे अभियान राबवण्यात येत आहे. रत्नागिरी येथे येऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कोठडीला आणि लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थळाला भेट देऊन त्यांच्या त्यागासमोर आपण नतमस्तक झालो, असे प्रतिपादन केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले. शुक्रवारी रत्नागिरीत आलेल्या ना. राणे यांनी विशेष कारागृहातील स्वा. विनायक दामोदर सावरकर यांनी ज्या कोठडीत तुरुंगवास भोगला त्या कोठडीला भेट दिली. तेथील स्वा. सावरकर यांच्या तैलचित्राला अभिवादन केले आणि त्यांनी तेथील बंदीवानांशी संवाद साधला आणि त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी कारागृह अधीक्षक श्री. चांदणे यांनी ना. राणे यांचे व अन्य मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर ना. राणे यांनी शहरातील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जन्मस्थळाला भेट दिली. लोकमान्य टिळकांच्या पूर्णाकृती पुतळ्याला त्यांनी अभिवादन केले. टिळकांच्या निवासस्थानाला भेट देऊन तेथे जतन केलेल्या आठवणींची माहिती घेतली. यावेळी तेथे स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला. राज्यातील सर्वात जुन्या नगर वाचनयालाही ना. राणे यांनी भेट देऊन तेथील ग्रंथांची आणि वाचनालयाची माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत माजी खासदार नीलेश राणे यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुरानी जाखड, पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी प्रशांत पाडळकर, तहसीलदार शशिकांत जाधव व भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.