
रत्नागिरी नगरपरिषदेचे दुर्लक्ष म्हणून भारतीय जनता युवा मोर्चाने शिवाजीनगर येथे बुजवले खड्डे
रत्नागिरी- गेले अनेक दिवस शिवाजीनगर परिसरात फुटभर खोल पडलेल्या चरामध्ये वाहनचालकांना भयंकर त्रास होत असल्यामुळे आज शेवटी भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हे खड्डे भरले आणि अनेक वाहनचालकांनी आभार मानले. ही चर्चा सर्वत्र पसरताच पुन्हा हेच व्यवस्थित भरलेले खड्डे भरण्यासाठी नगरपरिषदेचे कर्मचारी तेथे पोहोचले. नगरपरिषदेच्या या कारभाराबाबत नागरिकांनी मात्र नाराजी व्यक्त केली.
भारतीय जनता युवा मोर्चाच्या शहर कार्यकर्त्यांनी आज सकाळी शिवाजीनगर येथे श्रमदान करून खड्डे भरले. या मुख्य मार्गावर भरपूर वर्दळ पाहायला मिळते. आजही सकाळी ही वर्दळ होती. परंतु भाजयुमोने बॅरिकेटस लावून, वाहतुकीचे नियोजन करून तासाभरात दोन ठिकाणचे चर भरले. हा चर सुमारे फुटभर खोल होता. या खड्ड्यांमुळे शहरवासीय, दुचाकी, चारचाकी वाहनचालक त्रस्त झाले होते. गेले अनेक दिवस हे खड्डे भरण्यात आले नाही. त्यात गेल्या चार दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे या खड्ड्यांत पाणी साचल्याने नेमका खड्डा किती खोल आहे हे वाहनचालकांना कळत नव्हते. त्यामुळे भाजयुमोचे शहराध्यक्ष विक्रम जैन शहर भाजप शहर सरचिटणीस संदीप सुर्वे सरचिटणीस प्रवीण देसाई, यांच्यासह चिटणीस मंदार लेले व हर्षद घोसाळकर, प्रसाद बाष्टे तन्मय दाते व अन्य कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन शिवाजीनगर येथे दोन चरांमध्ये डबर आणून भरून टाकले.
या वेळी भाजयुमो द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनीही श्रमदानात भाग घेतला. त्या वेळी यांनी सांगितले की, शहरामध्ये अशा प्रकारे बरेच खड्डे आहेत. आमचे कार्यकर्ते खड्डे भरण्याचा विचार करत आहेत,गेल्या महिन्याभरात खड्डे जैसे थे आहेत. त्यामुळे भाजयुमोने पुढाकार घेत हे खड्डे भरले
www.konkantoday.com