
भाजपा आमदार नितेश राणे यांनी केलेल्या एका वक्तव्याने सध्या राजकीय वर्तुळात आणि कोकणात जोरदार चर्चा रंगली
शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राणे पिता-पुत्रांकडून शिवसेनेसह उद्धव ठाकरे तसंच आदित्य ठाकरेंना नेहमी लक्ष्य केलं जातं. यादरम्यान भाजपा आमदार नितेश राणे यांनी केलेल्या एका वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात आणि कोकणात जोरदार चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे शिवसेना नेते उपस्थित असणाऱ्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या
सिंधुदूर्गमध्ये सागररत्न बाजपारपेठेचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता.यावेळी शिवसेनेचे नेते दीपर केसरकर, विनायक राऊत उपस्थित होते. यावेळी नितेश राणे यांनी पक्षाच्या नेतृत्वाने आदेश दिल्यास आम्ही खांद्याला खांदा लावून काम करुन असं म्हणत अप्रत्यक्षपणे युतीला पाठिंबा दर्शवला.
“सिंधुदूर्ग जिल्हा, कोकण आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी कोणासोबतही एकत्र काम करण्याची वेळ आली आणि आमच्या पक्षनेतृत्वाचा आदेश आला तर आम्ही सगळे कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून काम करु,” असं नितेश राणेंनी सांगितलं. पुढे ते म्हणाले की, “काही दिवसांपूर्वी राज्यात युतीची चर्चा सुरु होती, ती नंतर बंद झाली. पण आता भाजपा आणि शिवसेनेचे नेते एकाच व्यासपीठावर आल्याने युतीचे चाहते सुखावले असतील. आज रात्री त्यांना चांगली झोप लागेल”.असंही त्यांनी म्हटलं आहे
www.konkantoday.com