
वर्षावर मध्यरात्री खलबतं; मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये रात्री उशिरापर्यंत बंद दाराआड चर्चा; चर्चेचा तपशील गुलदस्त्यात
मुंबई-* राज्याच्या राजकारणात चाललंय तरी काय? असा प्रश्न काल (सोमवारी) रात्रीपासून सर्वांना पडला आहे. याचं कारणंही तसंच आहे. काल सोमवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी एक बैठक पार पडली. या बैठकीला राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्रीही उपस्थित होते. महत्त्वाची बाब म्हणजे, या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट नागपुरातून पोहोचले होते. तब्बल दीड तास चाललेल्या बैठकीत नेमकं काय झालं? याबाबत मात्र काहीच माहिती मिळालेली नाही. काल रात्री उशिरापर्यंत मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची चर्चा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रात्री उशिरा दीड तास बैठक झाली. या बैठकीला मावळचे खासदार श्रीरंग बारणे देखील उपस्थित होते. त्याचवेळी नागपूरहून मुंबईत दाखल झालेले देवेंद्र फडणवीस थेट वर्षा निवासस्थानी दाखल झाले. वर्षावर त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. थोड्यावेळानं अजित पवार चर्चा संपवून निघाले. मात्र अजित पवारांनंतर फडणवीसांची रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री शिंदेंशी खलबतं सुरू होती. दरम्यान, आज भाजप नेत्यांची दिल्लीत बैठक आहे. दिल्लीतील वरिष्ठ नेतृत्वाची राज्यातले नेते भेट घेणार आहेत. फडणवीसही राज्यातल्या वरिष्ठ नेत्यांशी भेट घेतील. दरम्यान फडणवीसांच्या सरकारमधून मोकळं होण्याच्या मागणीवर भाजप नेते काय निर्णय घेणार याची उत्सुकता आहे. लोकसभेत महायुतीची एकूणच सुमार कामगिरी लक्षात घेता, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुशंगानं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या होणाऱ्या बैठका या महत्वाच्या मानल्या जात आहेत. नवी दिल्लीत भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक होणार आहे. ज्या राज्यात येत्या काळात विधानसभा निवडणुका आहेत, त्या राज्यातील प्रमुख नेत्यांना दिल्लीला बोलावण्यात आलं आहे. महाराष्ट्रातून या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, चंद्रकांतदादा पाटील, रावसाहेब दानवे उपस्थित राहणार आहेत. लोकसभेच्या निकालानंतर फडणवीस यांनी उपमुख्यंत्रिपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. पंकजा मुंडेही या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रात भाजपमध्ये मोठे बदल होण्याची दाट शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून प्रभारी आणि सहप्रभारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भूपेंद्र यादव यांची भाजपचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी आणि अश्विनी वैष्णव यांची भाजपचे महाराष्ट्र निवडणूक सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्षांच्या कामगिरीचा प्रभारी आढावा घेणार आहेत.