भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह मंगळवारपासून विविध कार्यक्रम आणि उपक्रम – दीपक घाटे

रत्नागिरी, दि. 7 : अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती व वंचित दुर्बल घटकातील व्यक्तींच्या सर्वागीण विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी तसेच जनजागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने दरवर्षी दि. 8 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय आणि त्यांच्या अधिनस्त असणाऱ्या कार्यालयामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी दिली.

मंगळवार दि. 8 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह या कार्याक्रमाचे उदघाटन करण्यात येणार असून पत्रकार परिषदेचे आयोजन करून कार्यक्रमांची माहिती जनतेला देण्यात येणार आहे. तसेच दि.8 एप्रिल ते दि. 14 एप्रिल रोजी भारतीय संविधानाची उद्देशिका/ प्रस्ताविका यांचे वाचन करून भारतीय जनतेत संविधाना विषयी जनजागृती निर्माण करण्यात येणार आहे.

बुधवार दि. 9 एप्रिल रोजी विभागातील सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय वसतिगृहे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचांरावर आधारीत वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करणे. तसेच जिल्हा व विभागीय स्तरावर कार्यक्रमाचे आयोजन करून विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा लाभ प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना वाटप करणे.

गुरुवार दि. 10 एप्रिल रोजी विभागामध्ये समतादूतांमार्फत ग्रामीण व शहरी भागात पथनाट्य व लघुनाटिका या द्वारे सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांबाबत जनतेचे प्रबोधन करण्यात येणार आहे. तसेच सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्यामार्फत जिल्ह्यात मार्जिन मनी योजनेंतर्गत कार्यशाळा आयोजित करणे. तसेच या योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे.

शुक्रवार दि. 11 एप्रिल रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करणे. तसेच महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्याविषयी वक्ता बोलावून कार्यक्रमांचे आयोजन करणे.

शनिवार दि. 12 एप्रिल रोजी संविधान जागर- भारतीय संविधाना विषयी सर्वसाधारण माहिती देणे जसे की, संविधानाची निर्मिती, संविधान निमिर्ती समिती, अनुच्छेद, विशेषतः मुलभूत अधिकार व मुलभूत कर्तव्ये याविषयी व्याख्यान आयोजित करणे. तसेच सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण या कार्यालयात महिला मेळावा आयोजित करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेल्या कार्याबद्दल माहिती देणारे व्याख्यान आयोजित करणे.

रविवार दि. 13 एप्रिल रोजी जिल्ह्यात जेष्ठ नागरिकांसाठी जनजागृती शिबीर व ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा आयोजित करणे. तसेच जिल्हयात जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सहकार्याने विभागातील सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय वसतिगृहे येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करणे. तसेच सर्व शासकीय कार्यालयांमध्ये स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने जिल्हयातील सर्व महत्वाच्या ठिकाणी व अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांमधून स्वच्छता अभियान राबविणे.

सोमवार दि. 14 एप्रिल रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिनस्त सर्व शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन व इतर कार्यक्रम, व्याख्याने, चर्चासत्र इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करणे.

या कार्यक्रमास उपस्थित राहण्याकरिता संबंधित लोकप्रतिनिधींना निमंत्रित करणे. जिल्हास्तरावर कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान मेळावा आयोजित करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याबद्दल माहिती सांगणारे व्याख्यान आयोजित करणे.या दिवशी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात Online-Validity प्रमाणपत्र प्रदान करणे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे समारोप. 000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button