धरण फुटून झाली दोन वर्षे, मात्र धरण फुटीचा अहवाल अजुनही सरकारी कारभाराच्या गाळातच

चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील धरण फुटीला दोन वर्षे पूर्ण होत आली. तरी या प्रकरणी अद्याप कोणावरही कारवाई झालेली नाही. या दुर्घटनेनंतर शासनाने स्थापन केलेल्या विशेष चौकशी पथक व पुनर्विलोकन समितीचे अहवाल अद्यापही गुलदस्त्यात का आहेत, तिवरे धरणफुटीप्रकरणी संबंधित जबाबदार लोकांवर कारवाई का होत नाही, असा सवाल चिपळूणवासियांमधून उपस्थित केला जात आहे.
चिपळूण तालुक्यातील तिवरे भेंदवाडी येथील धरण २ जुलै २०१९ रोजी फुटल्याने मोठी जीवित व वित्तहानी झाली. यामध्ये २२ ग्रामस्थांचा नाहक बळी गेला. या दुर्घटनेची शासनाने गांभीर्याने दखल घेत ६ जुलै रोजी २०१९ रोजीच्या आदेशान्वये या जीवित व वित्तहानी प्रकरणी सखोल चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी पथक नेमले.
या नुसार या विशेष पथकाने आपला अहवाल सादर केल्यानंतर पुन्हा पुनर्विलोकन समिती स्थापन करण्यात आली. या समितीला आणखी दोन महिन्यांची म्हणजेच २० फेब्रुवारी २०२१ अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र या पुनर्विलोकन समितीच्या अहवालाचे पुढे काय झाले हे अजून कळले नाही. एकंदरीत तिवरे धरणफुटी प्रकरणी अद्याप कोणावरही कारवाई न झाल्याने सखेद आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच तिवरे धरणग्रस्तांचे अद्यापही काही प्रश्‍न प्रलंबित आहेत. यामुळे या तिवरे धरणग्रस्तांसह मृत ग्रामस्थांना न्याय मिळणार की नाही? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button