
कडक लॉकडाऊन आता पुरे, व्यापारी व सर्वसामान्यांना दिलासा द्या; आम. डॉ. राजन साळवींचे प्रशासनाला आवाहन
जिल्ह्यात मागील काही महिने लॉकडाऊन, कडक लॉकडाऊन आता पुरे झाले. पुढे आर्थिक संकटाला देखील तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे आता व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना लॉकडाऊनमध्ये शिथिलता देऊन काही निर्बंधासह दुकाने उघडी करण्यास मुभा द्यावी असे आवाहन राजापूर लांजा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजन साळवी यांनी प्रशासनाला केले आहे. लोकांना टाळेबंधीत अधिक अडकवून ठेवणे योग्य होणार नाही. असेही त्यांनी सूचित केले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात स्थानिक पातळीवर ३ जून ते ९ जून पर्यंत कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला होता. उद्या बुधवारी लॉकडाऊनची मुदत संपत आहे. तसेच अतिवृष्टी निमित्त ११ व १२ जून रोजी जिल्ह्यात कर्फ्यु लावण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. त्यामुळे लांजा राजापूर मतदार संघातील व्यापारी संघटना व रिक्षा व्यावसायिक यांनी आम. डॉ. राजन साळवी यांना निवेदन देऊन या पुढे लॉकडाऊन न करता शिथिलता देऊन दुकाने उघडी करण्याची मुभा द्यावी अशी मागणी केली आहे. व्यापाऱ्यांच्या मागणीची दखल घेत आम. डॉ. राजन साळवी यांनी जिल्हा प्रशासनाला आवाहन केले आहे. कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनता व व्यापारी मेटाकुटीस आली आहे. महामारीत लोकांचे जीव वाचवणे महत्वाचे आहेच. परंतु लोकांना उपाशी मारणे देखील योग्य होणार नाही. सर्व व्यवहार बंदीमुळे आगामी काळात मोठे आर्थिक संकट उभे राहण्याची देखील भीती आहे. त्यामुळे परिस्थितीचे अवलोकन करून व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणे आवश्यक असल्याचे आम. डॉ. राजन साळवी यांनी म्हटले आहे. प्रशासनाने या बाबत त्वरित निर्णय घेऊन महाराष्ट्र शासनाने दिलेल्या निर्बंध व नियमाला अधिन राहून व्यापाऱ्यांना काही निर्बंध आणि वेळेचे मर्यादा ठेवून दुकाने उघडी ठेवण्यासाठी मुभा द्यावी असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
www.konkantoday.com