मुंबई गोवा महामार्गावरील भरणे नाका येथील वाहतुक कोंडी संपणार कधी?

खेड : मुंबई गोवा महामार्गावरील भरणे नाका येथे महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होत आहे. महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने आवश्यक त्या उपाययोजना करून या ठिकाणची वाहतुक कोंडी संपुष्टात आणून वाहन चालक आणि प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.
खेड तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. कशेडी ते पशुराम घाट या दरम्यानच्या ४४ किलोमिटर रस्त्यापैकी अवघड भोस्ते घाटाच्या कामासह बहुतांशी काम पुर्ण झाले आहे. मात्र वाहने आणि पादचाऱ्यांची वर्दळ असलेल्या भरणे नाका येथेच या कामाला ग्रहण लागले आहे. भरणे नाका येथे असलेल्या पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होत असते.
हा संपुर्ण परिसर मार्केट परिसर असल्याने या ठिकाणी ग्राहकांचीही सतत गर्दी असते. या पार्श्वभुमीवर भरणे जक्शनवरील चौपदरीकरणाचे काम वेळेत पुर्ण करणे आवश्यक होते. मात्र गेली तीन वर्षे जंक्शनवरील काम सुरुच असल्याने वाहतुकीचे तीन-तेरा वाजले आहेत. सद्यस्थितीत भरणे जंक्शनवर उड्डाण पुल उभारण्याच्या कामाला सुरवात करण्यात आली आहे. गेले अनेक महिने हे काम सुरुच आहे.
या ठिकाणी वाहनांची होणारी गर्दी लक्षात घेत एकेरी मार्गाचा अवलंब करणे आवश्यक होते. मात्र या जक्शंनवर आधीच अरुंद झालेल्या रस्त्यावर दोन्ही बाजूने वाहने येत असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होवू लागली आहे. काही वाहन चालक अगदी बेशिस्तपणे वाहने हाकत असल्याने वाहतुक कोंडीमध्ये आणखीनच भर पडत आहे.
या ठिकाणी होणारी वाहतुक कोंडी फोडण्यासाठी जंक्शनवर कायमस्वरुपी वाहतुक पोलिसांची नेमणुक करणे गरजेचे आहे. नाहीतर या ठिकाणी भिषण अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button