निवोशीत (गुहागर) मुख्य वाहिनीवरील विद्युत खांब जीर्ण


गुहागर : तालुक्यातील निवोशी गाव वीज समस्यांच्या गर्तेत कायम असून, येणाऱ्या पावसाळ्यात संपूर्ण गाव परिसर अंधारात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निवोशी गावाच्या भौतिक परिस्थितीचा विचार करता हे गाव अतिदुर्गम, डोंगराळ भागात वसलेले आहे. येथील विद्युतवाहिन्या डोंगर भागातून प्रवाहित केल्या असल्याने सर्व्हिस लाईन तसेच मेन लाईनवरील जास्तीत जास्त विद्युत पोल चढ उतार असलेल्या डोंगर भागात उभे असल्याचे पाहायला मिळते; मात्र अतिवृष्टी पावसाळ्यात व अचानक येणारे चक्रीवादळ यामुळे इथे विद्युत पोल पडण्याचे प्रमाण खूप मोठे आहे.

कोकणात थैमान घातलेल्या फयान, अम्फान, तौक्ते चक्रीवादळाच्या वेळी निवोशीत अनेक लाईट पोल पडून जवळजवळ एक महिन्यापेक्षा अधिक काळ येथील ग्रामस्थांना अंधारात राहावे लागले होते. अशीच परिस्थिती पुन्हा उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली असून, निवोशी दणदणे वाडीनजिक पालशेत-पोमेंडी मुख्य रस्त्यालगत असलेल्या विद्युत वाहिनीच्या मेन लाईनवरील खांब जमिनीपासून काही फूट उंचीवर गंजलेला असून, तो जीर्णावस्थेत असल्याचे निदर्शनास आले आहे. डोंगर भागात असे अनेक पोल तग धरून उभे असल्याचे ग्रामस्थांकडून समजते. विशेष म्हणजे रस्त्यागतच असलेल्या या विजेच्या खांबाकडे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचारी यांचे दुर्लक्ष होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे.
प्रमुख रस्त्यानजीकच असलेल्या या धोकादायक पोलामुळे शेतकऱ्यांच्या, रस्त्यावरून पायी ये- जा करणाऱ्या नागरिकांच्या, मुक्या प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी उप कार्यकारी अभियंता गुहागर संबंधित विभाग अधिकारी यांनी या समस्येची तात्काळ दखल घेऊन मान्सूनपूर्व हा पालशेत -निवोशी दरम्यान असलेल्या मुख्य विद्युत लाईन तसेच सर्व्हिस लाईनची सुरक्षा हेतू पाहणी करून कोणतीही दुर्घटना होणार घडू नये त्याचबरोबर वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी योग्य ती उपाययोजना करणे आवश्यक बनले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button