
लंडनला स्थायिक होण्याचं स्वप्न स्वप्नच राहिलं; विमान अपघातात कुटुंबाचा करुण अंत
अहमदाबादेत काल एअर इंडियाचे विमान क्रॅश झाले. या विमानातील सर्व प्रवासी मृत्यूमुखी पडले आहेत. यातील एका कुटुंबाची कहाणी अत्यंत हृदयद्रावक अशीच आहे.एका नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी अख्खं कुटुंबच लंडनला निघालं होतं. पण नियतीच्या मनात काही वेगळच होतं. या अपघातात राजस्थानातील एकूण दहा जणांचा मृत्यू झाला आहे. यातील पाच जण बांसवाडा येथील जोशी परिवारातील होते.
प्रतिक जोशी मागील सहा वर्षांपासून लंडनमध्ये एक सॉफ्टवेअर प्रोफेशनल म्हणून काम करत होते. त्यांचं एकच स्वप्न होतं आपली मुलं आणि पत्नीलाही लंडनला घेऊन येथेच सेटल होण्याचं. त्यांचं स्वप्न लवकरच सत्यात उतरणार होतं. पण दुर्दैवाने विमान अपघातात या त्यांचा मृत्यू झाला. प्रतिक जोशी यांची पत्नी डॉ. कोमी व्यास देखील मयत झाल्या आहेत. कोमी या एक मेडिकल प्रोफेशनल होत्या. लंडनमध्ये स्थायिक होणार असल्याने त्यांनी दोन दिवसांपूर्वीच नोकरीचा राजीनामा दिला होता. त्यांच्याबरोबर त्यांची तीन मुलं देखील होती. परंतु, लंडनला जाणं दूरच त्याआधीच मृत्यूने त्यांना गाठलं. या घटनेची माहिती मिळताच पूर्ण बांसवाडात शोककळा पसरली.