
भाजपाच्या माजी नगरसेवकांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट अधिवेशनात हजेरी; मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार निरंजन डावखरेंकडे विविध मागण्या सादर
* *रत्नागिरी :* मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यानिमित्त रत्नागिरीतील भाजपाचे नगरसेवक राजू तोडणकर, मुन्ना चवंडे, उमेश कुळकर्णी व पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री व भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन रत्नागिरी शहरासाठी विकासनिधीची विनंती केली. रत्नागिरी शहराच्या विकासाकरिता विविध विषयांवर चर्चादेखील केली. लोकसभा मतदारसंघात भाजपाचे खासदार नारायण राणे आणि कोकण पदवीधर मतदारसंघात आमदार निरंजन डावखरे यांनी हॅटट्रिक करत यश मिळवल्याने या निवडणुकीमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकांच्या योगदानाबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केले.भाजपाचे राजू तोडणकर यांच्यासमवेत भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर, मुन्ना चवंडे, उमेश कुळकर्णी, माजी शहराध्यक्ष सचिन करमरकर हेदेखील उपस्थित होते. मुंबई येथे पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने सर्वप्रथम सार्वजनिक बांधकाममंत्री, कोकणचे भाग्यविधाते रविंद्र चव्हाण यांच्यासमवेत त्यांच्या शासकीय बंगल्यावर श्री. राजू तोडणकर व सहकाऱ्यांनी भेट घेतली. त्यांच्यासमवेत विविध विकासात्मक विषयांवर गप्पा झाल्या. त्यावेळी मंत्री चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक व रत्नागिरीचे सुपुत्र अनिकेत पटवर्धन यांनी विधानभवनाचे पास काढून दिले. त्यानंतर विधानभवनात गेलो, नवनिर्वाचित आमदार निरंजन डावखरे यांच्यासमवेत पालकमंत्री उदय सामंत यांच्या दालनात भेट झाली. निरंजन डावखरे यांचे विशेष अभिनंदन केले. पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडेही प्रभागातील विविध विकासकामांबाबात मागण्या मांडल्या.त्यानंतर राजू तोडणकर व सहकाऱ्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आमदार प्रसाद लाड यांनी ही भेट घडवून आणली. त्या भेटीमुळे खूप आनंद झाल्याचे राजू तोडणकर यांनी सांगितले. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केलेली रत्नागिरीची नळपाणी योजना सुरळित सुरू झाली नसल्याबद्दल व रत्नागिरीच्या विकासाकरिता वाढीव निधी मिळण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर आमदार नितेश राणे, आमदार पराग अळवणी यांची भेट झाली. त्यांनीसुध्दा गप्पा मारल्या. विधानभवनातील वातावरण अतिशय आनंददायी होते, असे राजू तोडणकर यांनी सांगितले.