देशभरातील जवळपास ७० टक्के विद्यापीठे परीक्षांबाबत सकारात्मक?
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) सूचनेनंतरही अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याची भूमिका राज्य सरकारने कायम ठेवली असताना देशभरातील जवळपास ७० टक्के विद्यापीठे परीक्षांबाबत सकारात्मक असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही विद्यापीठांनी परीक्षा घेतल्या असून, अनेक विद्यापीठे ‘यूजीसी’च्या सूचनांनंतर परीक्षेचे नियोजन करत आहेत.
अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याबाबत ‘यूजीसी’ने ६ जुलै रोजी विद्यापीठांना सुधारित सूचना केल्या होत्या. त्यानंतरही राज्य सरकारने परीक्षा न घेताच पदवी देण्याची भूमिका कायम ठेवली. मात्र, देशभरातील शेकडो विद्यापीठांची परीक्षा घेण्याची तयारी असल्याचे स्पष्ट झाले आहे.यूजीसी’ने मार्गदर्शक सूचनांवर विद्यापीठांचे मत मागवले होते. त्यास देशातील अभिमत, खासगी, केंद्रीय आणि राज्य विद्यापीठे अशा ६५८ विद्यापीठांनी प्रतिसाद दिला. त्यातील ४५४ विद्यापीठे परीक्षांबाबत सकारात्मक आहेत. यातील अनेक विद्यापीठांच्या परीक्षा घेऊनही झाल्या आहेत, तर काही विद्यापीठे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये परीक्षा घेण्याची तयारी करत आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने परीक्षा घेण्यासाठी अनेक पर्याय विद्यापीठांना दिले होते. त्यानुसार किंवा प्रसंगी नवे पर्याय शोधून विद्यापीठांनी परीक्षांचे कामकाज पुढे नेले आहे.
www.konkantoday.com