
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात नाचणे ग्रामपंचायत प्रथमआंबव (संगमेश्वर), विरसई (दापोली), खामशेत (गुहागर) विशेष पुरस्कारासाठी पात्र.
रत्नागिरी : जिल्हा परिषद गटात राबविण्यात आलेल्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान २०२४-२५ मध्ये नाचणे (रत्नागिरी), खरवते (राजापूर) आणि हातिव (संगमेश्वर) या ग्रामपंचायत यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झालाराऊन, पुरस्काराची रक्कम अनुक्रमे ६ लाख, ४ लाख आणि ३ लाख अशी आहे.त्याचप्रमाणे उर्वरित ग्रामपंचायतीमधून आंबव (संगमेश्वर), विरसई (दापोली), खामशेत (गुहागर) या ३ ग्रामपंचायतींची विशेष पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन २०२४-२५ अंतर्गत जिल्हा परिषद गटामधील प्रथम क्रमांकाच्या ग्रामपंचायतीमधून सर्वात जास्त गुण प्राप्त करणाऱ्या फक्त १ ते ९ क्रमांकाच्या ग्रामपंचायतींची तपासणी जिल्हास्तरीय तपासणी समितीकडून करून जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या ग्रामपंचायतीची निश्चित करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव यांच्या आदेशान्वये तपासणी पथकांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी ग्रामपंचायतींची निवड केली आहे.विशेष पुरस्कार देण्यात येणाऱ्या आंबव (संगमेश्वर) ग्रामपंचायतीला स्व. वसंतराव नाईक पुरस्कार (सांडपाणी व्यवस्थापन) विरसई (दापोली) ग्रामपंचायतीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार (पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन), तर खामशेत (गुहागर) ग्रामपंचायतीला स्व. आबासाहेब खेडकर पुरस्कार (शौचालय व्यवस्थापन) देण्यात येणार असून, या पुरस्काराचे रक्कम प्रत्येकी ५० हजार रुपये आहे. मान्यवरांच्या हस्ते लवकरच या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.