नाणार रिफायनरी हा संपलेला विषय,कोकणात रोजगारासाठी शासनाने तालुकानिहाय एमआयडीसी विकसित कराव्यात!
गाव विकास समिती,रत्नागिरी जिल्हा संघटनेचे सुहास खंडागळे यांची भूमिका!
:-कोकणच्या तरुणांची ५ वर्षे नाणार प्रकल्प विरोधाच्या वातावरणात गेली आता पुढील पाच वर्षे नाणार समर्थन व विरोधाच्या चर्चेत जातील, यात कोकणची एक तरुण पिढी आपला रोजगार गमावून बसलेली असेल तेव्हा नाणार हा विषय आमच्यासाठी व कोकणातील तरुणांसाठी संपला आहे,आता तालुकानिहाय उद्योगधंदे व पर्यावरण पूरक व्यवसाय कोकणात आणण्याचे काम शासनाने करावे असे स्पष्ट मत गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी व्यक्त केले आहे.
कोकणातील तरुणांनी प्रत्येक तालुक्यात असणाऱ्या एमआयडीसी मध्ये नवीन प्रकल्पांसाठी शासनावर दबावतंत्राचा वापर करायला हवा.हा दबाव इतका हवा की कोकणातील प्रत्येक तालुक्यात असणाऱ्या एमआयडीसी मध्ये त्या त्या भागाच्या दृष्टीने पूरक असणारे व्यवसाय, नवीन उद्योगधंदे,प्रोसेसिंग युनिट,आय टी कंपन्या या सुरू होण्यासाठी शासनाला सकारात्मक पाऊल उचलण्यासाठी भाग पाडले पाहिजे.नानार प्रकल्प रद्द करण्यात आला तेव्हा गाव विकास समिती मार्फत आम्ही भूमिका मांडताना हा प्रकल्प नानार येथील शेतकरी यांची भूमिका पाहता त्यांच्या भावनां लक्षात घेता तो प्रकल्प नानार भागात रद्द करावा आणि कोकणात अन्य ठिकाणी जिथे नागरिकांचा विरोध नसेल तिथे तो प्रकल्प करण्यात यावा अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री यांच्याकडे केली होती.मात्र तेव्हा आमच्यावर टीका करण्यात आली याकडे खंडागळे यांनी लक्ष वेधले आहे.तेव्हा विरोध करणारे अनेक राजकिय पक्ष हळूहळू आपल्या भूमिका बदलत असून नानार चे समर्थन करत आहेत. आमची भूमिका आजही तीच आहे,हा प्रकल्प नानार ला न करता कोकणात अन्य ठिकाणी सर्वेक्षण करून करावा जेणेकरून प्रकल्प देखील बाहेर जाणार नाही आणि नाणार येथे प्रकल्प रद्द झाल्याने स्थानिक भूमिपुत्र शेतकऱ्यांना न्याय सुद्धा मिळेल, ज्या कथित भु माफियांनी शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने विकत घेतल्या आहेत त्यांचा हेतू साध्य होणार नाही असेही खंडागळे यांनी म्हटले आहे.मात्र आता पुन्हा नाणार येथेच प्रकल्प व्हावा ही चर्चा केवळ जुन्या विषयाला हवा देऊन त्यावर चर्चा सुरू करणारी ठरेल,पुन्हा कोकणात संघर्षाचे वातावरण निर्माण होईल.तरुणांचे ,नागरिकांचे लक्ष त्याच विषयाकडे वळेल आणि मूळ उद्देश, कोकणचे अन्य प्रश्न बाजूला राहतील.या सर्व गदारोळात पुन्हा कोकणच्या लोकांची पाच ते सहा वर्षे वाया जातील. परिणामी कोकणातील नागरिक आणि तरुणांनी आता शासन,स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडे अन्य कोकणाला पूरक रोजगार ,व्यवसाय,तालुकानिहाय एमआयडीसी यासाठी त्यांच्या त्यांच्या भागात पाठपुरावा करायला हवा असे आवाहन गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी केले आहे.नानार विरोधाचे आणि नानार समर्थनाचे राजकारण कोकणच्या हिताचे नाही ,अन्य पर्याय शोधावे लागतील,विरोध होणाऱ्या प्रकल्पांवर तात्काळ निर्णय घ्यायला हवा,आणि आला प्रकल्प करा विरोध ही भूमिका देखील कोकण वासीयांनी सोडायला हवी असे मत सुहास खंडागळे यांनी व्यक्त केले आहे.आगामी काळात नानार या विषयावरुन राजकारण तापल्यास तरुणांनी त्या पासून दूरच रहावे असे खंडागळे यांनी म्हटले आहे.कोकणात तालुक्याच्या ठिकाणी रोजगार हाच स्थलांतर आणि बेरोजगारी यांवर उपाय असल्याचे सुहास खंडागळे यांनी म्हटले आहे.
www.konkantoday.com