
मिर्या-नागपूर महामार्गाच्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे, कॉंक्रिटीकरणाला पडल्या भेगा.
मिर्या-नागपूर महामार्गाचे काही महिन्यांपूर्वीच करण्यात आलेले कॉंक्रिटीकरणाच्या मार्गिकेला ठिकठिकाणी मोठे तडे गेले आहे. हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याची ओरड सुरू आहे. कॉंक्रिटीकरणाला भेगा पडल्या असून मलमपट्टीचे कामकाज सुरू आहे. महामार्गावरील कारवांचीवाडी परिसरात रस्त्यावर पडलेल्या भेगांमुळे प्रवासी आणि वाहनधारकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. रस्ता बांधून वर्षही उलटले नाही, तरीही त्यात तडे जाऊ लागल्याने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. रस्त्यांचे काम झाल्यानंतर त्याची गुणवत्ता तपासणे, देखरेख करणे आणि दोष दिसल्यास संबंधित ठेकेदाराकडून दुरुस्ती करून घेणे ही महामार्ग प्राधिकरण विभागाची जबाबदारी असते. मात्र, प्रत्यक्षात यातील कुठलाही टप्पा नीट पार पडलेला दिसत नाही. रवी इन्फ्रा कंपनीने वेगाने काम करत असल्याचे दाखवून दर्जाहीन काम केल्याचे या प्रकारातून स्पष्ट होत आहे. कॉंक्रिटीकरण मार्गिका तुकड्यात पूर्ण झाल्यानंतर त्याची तपासणी, गुणवत्ता चाचणी आणि वारंवार देखरेख होणे गरजेचे असतानाही या कामांकडे प्राधिकरणाच्या अधिकार्यांनी डोळेझाक का केली, हा मोठा प्रश्न आहे.www.konkantoday.com