
महामोर्च्याने रत्नागिरी दणाणली, सुमारे १५ हजारच्यावर जनसमुदाय उपस्थित
केंद्र सरकारने लादलेल्या नागरिकत्व कायद्याविरोधात रत्नागिरीकरांनी आम्ही भारतीय नागरिक तर्फे महामोर्च्याचे आज सकाळी आयोजन केले होते. या महामोर्चासाठी हजारोंच्या संख्येने संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर तालुक्यांतील सर्व धर्मीय नागरिक या मोर्च्यात सहभागी झाले होते. त्यामध्ये मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. सुरूवातीला चंपक मैदानात मोठ्या प्रमाणावर जमलेल्या जनसमुदायाला विविध नेत्यांनी मार्गदर्शन केले. त्यामध्ये विविध पक्षाचे नेते सहभागी झाले होते. यावेळी सर्वच नेत्यांनी केंद्र सरकारने देशवासियांवर लादलेल्या कायद्याला विरोध केला. यामध्ये आसिफ सिद्दीकी, खा. हुसेन दलवाई, माजी कुलगुरू भालचंद्र मुणगेकर, राष्ट्रवादीचे कुमार शेट्ये, मिलिंद कीर, बशीर मुर्तुझा, सामाजिक कार्यकर्ते अभिजित हेगशेट्ये, नेते आदी मंडळी सहभागी झाली होती.
त्यानंतर हा विराट मोर्चा चंपक मैदानापासून निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. तेथे मोर्चाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले. या मोर्चात सर्व समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले असले तरी मुस्लिम बांधवांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता. मात्र या मोर्चाचे आयोजन आम्ही भारतीय नागरिक या संघटनेच्यावतीने करण्यात आला होता. मोर्चाच्यावेळी कोणालाही असुविधा निर्माण होणार नाही अथवा धर्म अथवा व्यक्तीच्या भावना दुखावणार नाही याची काळजी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे मोठ्या संख्येने उपस्थिती असूनही मोर्चा शांततेत पार पडला. मोर्चेकर्यांच्या संख्येमुळे जयस्तंभ परिसर फुलून गेला होता. शेवटी मोर्चेकर्यांनी जयस्तंभाला वळसा घालून परतण्यास सुरूवात केली. यावेळी मोर्चाच्या स्वयंसेवकांनीही चांगली भूमिका बजावली. त्यांनी ट्रॅफीक सुरळीत होण्यासाठी पोलिसांना सहकार्य केले. तरीही सुरक्षिततेचा उपाय म्हणून पोलिसांनी काही विभागातील ट्रॅफीक थांबवून ठेवल्यामुळे काही भागात त्यावेळी काही वेळ ट्रॅफीक जाम झाले होते. मोर्चेकर्यांसाठी पाण्याच्याही सुविधा विविध संघटनांनी उपलब्ध करून दिल्या होत्या. तसेच रस्त्यावर पडलेल्या बाटल्याही कार्यकर्त्यांनी उचलून रस्ता स्वच्छ करून दिला. त्यामुळे शिस्तबद्ध पद्धतीने झालेल्या या मोर्चामध्ये युवक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.
www.konkantoday.com