
तर राज्यात युतीचे सरकार पुन्हा आले असते. पण देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच युती तुटली–खासदार विनायक राऊत
अडीच वर्षांसाठी शिवसेनेला मुख्यमंत्रिपद दिले असते, तर राज्यात युतीचे सरकार पुन्हा आले असते. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच युती तुटली. यापुढे लोकसभा, विधानसभा निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविल्या जातील. स्थानिक स्वराज्य संस्थांचा निर्णय आम्ही स्थानिक पातळीवर सोडला आहे, असे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.
श्री. राऊत चिपळूण दौऱ्यावर होते. त्यादरम्यान पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला असता ते बोलत होते.सरकारने माझी सुरक्षा काढून घेतली याबद्दल माझी कोणतीच तक्रार नाही. माझ्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारने घेतली आहे. पण माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार असेल, असा इशारा नारायण राणे यांनी काल रत्नागिरीत दिला होता. त्याबाबत विचारले असता श्री. राऊत म्हणाले की, राणे यांना दहशतवाद्यांपासून धोका नाही. खरा धोका त्यांच्या मुलापासूनच आहे. त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर खापर फोडू नये. राज्यात महाविकास आघाडीचे सक्षम सरकार आहे. केंद्रात त्यांच्या पक्षाचे सरकार आहे. कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी राणेंना त्यांच्या दोन मुलांपासून धोका आहे. राणेंचे राजकारणात वलय आहे. त्यांच्याबद्दल बोलताना आम्ही कधी एकेरी बोलत नाही. पण नीलेश राणेंची भाषा असभ्य असते. खरे तर राणेंच्या दोन्ही मुलांना राजकारणात यशस्वी होण्यासाठी जे लागते ते सर्व उपलब्ध होते. पण दोघांना त्याचा योग्य उपयोग करून घेता आला नाही. नीलेश राणेंना मतदारांनी घरी बसविले. नीतेश राणेंकडे चांगले गुण असल्यामुळे ते पुढे जातील, असे वाटले होते, परंतु त्यांची बदलती वर्तणूक त्यांना भविष्यात घरात बसवल्याशिवाय राहणार नाही असेही राऊत म्हणाले
www.konkantoday.com