
फुलपाखरू उद्यानासाठी नागरिकांनी पुढे यावे ः समीर गुळवणे
रत्नागिरी ः आसमंत बेनेवोलन्स फाऊंडेशनतर्फे एमआयडीसीतील वनस्पती उद्यानात होणार्या फुलपाखरू उद्यानाने याला गती मिळेलच, नागरिकांनी यासाठी योगदान दिले पाहिजे, असे आवाहन ठाणे शहरी जैवविविधता ग्रुपचे प्रमुख समीर गुळवणे यांनी आयोजित कार्यक्रमात केले.
आसमंत फाऊंडेशनने फुलपाखरू उद्यानाची माहिती देण्याकरिता हॉटेल कांचन कार्निव्हल येथे एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात गुळवणे व संदीप रानणे यांनी ठाणे जैवविविधता ग्रुपची माहिती दिली. तसेच फुलपाखरांच्या संवर्धनासाठी ग्रुप काय करतो याची माहिती दिली. फुलपाखरांसंदर्भात आश्चर्यकारक माहिती व काही व्हिडिओसुद्धा दाखवले. या वेळी आसमंत फाऊंडेशनचे प्रमुख नंदकुमार पटवर्धन यांनी वनस्पती उद्यान व नव्याने होणार्या फुलपाखरू उद्यानाची माहिती दिली. रत्नागिरीतील अनेक क्षेत्रात काम करणार्या व्यक्तींना कार्यक्रमास हजेरी लावून फुलपाखरू उद्यानासाठी योगदान देऊ असे सांगितले.
फुलपाखरांच्या सुमारे १५०० जाती भारतात आढळतात. महाराष्ट्रासह २२५ प्रकारची व ठाण्यात ४० ते ५० प्रकारची फुलपाखरे दिसतात. रत्नागिरीतही असा अभ्यास झाला पाहिजे. फुलपाखरू संवर्धनासाठी नागरिकांनी पुढे येवून खारीचा वाटा उचलला पाहिजे असेही ते म्हणाले.