
आज राज ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेऊन मी कुणाच्याही अटींना जुमानत नाही, हे त्यांनी सिध्द केलं- उद्योग मंत्री उदय सामंत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यातच या भेटीनंतर मंत्री उदय सामंत आणि मनसे नेते संदीप देशपांडे यांचीही भेट झाली अन् चर्चांना उधाण आले.या दोन्ही बैठकांबाबत सामंतांनी आपली भूमिका स्पष्ट करताना काही मुद्द्यांवर थेट भाष्य केले.
उदय सामंत यांनी देशपांडे यांच्यासोबतच बैठक ही नवी मुंबईतील एका विकासकामांसंदर्भात होती, असे स्पष्ट केले. ते म्हणाले, देशपांडे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार होते. पण शिंदे सह्याद्रीला बैठकीला गेल्याने ते भेटू शकले नाहीत. आमच्याशी चर्चा झाली. दोन्ही बैठकांचा काही संबंध नाही, तो योगायोग समजावा, असे सामंतांनी सांगितले.महायुतीच्या बाबतीत निर्णय घेण्याचे अधिकार एकनाथ शिंदेंना आहेत. फडणवीस आणि ठाकरेंची भेट आज का होती, हे समजू शकले नाही. राज ठाकरेंच्या संदर्भातील भूमिका एकनाथ शिंदे घेतील. ते महायुतीत आले तर नक्कीच आमचा फायदा होईल, असेही ते म्हणाले.मी दोन महिन्यांपूर्वी सांगितले होते की, यूबीटीने अटींचा सिलसिला सुरू केला होता. राज ठाकरेंनी फडणवीसांना भेटायचे नाही, अमित शहांसोबत संबंध ठेवायचे नाही. त्यावेळीही मी सांगितले होते की, राजसाहेब हे स्वाभिमानी नेते आहेत. त्यांचे स्वतंत्र विचार आहेत. आज राज ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेऊन मी कुणाच्याही अटींना जुमानत नाही, हे त्यांनी सिध्द केल्याचे सामंत म्हणाले.
मी राज ठाकरेंना तीनदा भेटलो. तिथे खिचडी खाल्ली. युतीची खिचडी ही, त्यामध्ये कोणते साबुदाणे टाकायचे, किती मिरची टाकायची हे तीन नेते ठरवतील. आजच्या दोन्ही बैठका योगायोगाने झाल्या आहेत. आमच्या भेटीत विकासकामांची चर्चा झाली आहे.