
टीईटी घोटाळ्यातील नऊ शिक्षकांना नियुक्ती देण्यास रत्नागिरी जिल्हा परिषदेचा नकार
टीईटी घोटाळ्यातील नऊ शिक्षकांना नियुक्ती देण्यास रत्नागिरी जिल्हा परिषदेने नकार दिला आहे. पुणे पाेलिसांच्या अहवालात या नऊ शिक्षकांवर गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना जिल्हा परिषदेचे दार कायमचे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षक भरतीतील १ हजार १६ उमेदवारांना समुपदेशनाद्वारे नियुक्तीपत्र देण्यात आले होते. या भरती प्रक्रियेत २६ उमेदवार गैरहजर राहिले होते. या भरती प्रक्रियेच्या वेळी टीईटी घोटाळ्यातील ९ शिक्षक उमेदवार सहभागी झाल्याचे प्रशासनासमोर आले होते. हे सर्व उमेदवार परजिल्ह्यातील असल्याचे स्पष्ट झाले होते. या भरती प्रक्रियेमध्ये रत्नागिरीतही टीईटी घोटाळ्यातील उमेदवार असल्याचे समोर आले हाेते. त्यानंतर प्रशासनाची धावपळ उडाली हाेती. त्या नऊही उमेदवारांना नियुक्तीपत्र द्यावे की नाही, याबाबत शिक्षण विभागाने अहवाल मागविला होता. पुणे पाेलिसांचा अहवाल जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. त्यामध्ये नऊही जणांवर गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट कळविण्यात आले आहे; मात्र त्यामध्ये त्यांना नियुक्ती द्यावी की नाही, याबाबत काहीही कळविलेले नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेने त्या उमेदवारांना नियुक्तीपत्र न देण्याचा निर्णय घेतला आहे.