
कामथे रूग्णालयातील राजीनाम्याचे वादळ शमले, तीन डॉक्टर सेवेत रूजू
कामथे येथील उपजिल्हा रूग्णालयात यापुढे केवळ कोरोनाबाधित रूग्णच दाखल केले जाणार आहेत. इतर आजार असलेल्या रूग्णांना खाजगी रूग्णालयात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपजिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांवर येणारा ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय राजिनाम्याचे अस्त्र उगारलेले पाच पैकी तीन डॉक्टर सेवेत हजर झाले आहेत, अशी माहिती येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय सानप यांनी दिली. कामथे उपजिल्हा रूग्णालय कोविड सेंटर असले तरी येथे सर्प, विंचू दंश आणि इतर आजार असलेल्या रूग्णांवरही उपचार केले जात होते. कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे त्यांना उपचारासाठी कामथे उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले जाते. येथे दाखल होणार्या रूग्णांच्या नातेवाईकांवर डॉक्टरांचे खटके उडत असल्यामुळे काही डॉक्टर तणावाखाली होते. मध्यंतरी ८० कोरोनाबाधित रूग्ण दाखल होते. तेव्हा आमच्या रूग्णांना चांगली सेवा मिळत नाही असा आरोप करत काही नातेवाईकांनी डॉक्टरांना दमदाटी केली होती. त्यामुळे काही डॉक्टर रजेवर तर काहींनी राजीनामा देण्याची तयारी दर्शविली होती. जिल्हा शल्यचिकित्सकांची भेट घेवून डॉक्टरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. रूग्णालयात एकूण ३० डॉक्टर्स होते. त्यापैकी पाचजण वेगवेगळ्या कारणांनी गैरहजर आहेत. पाच डॉक्टरांना उपजिल्हा रूग्णालयाचा कारभार सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागत होती. आ. शेखर निकम यांच्यासह जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्यासह इतर शासकीय अधिकार्यांनी मध्यस्थी करून डॉक्टरांची समजूत काढली. त्यामुळे पाच पैकी तीन डॉक्टर हजर झाले आहेत.
www.konkantoday.com