
कोट्यवधी रुपये खर्च करून कार्यान्वित करण्यात आलेली आरटीडीएएस एआरएस सिस्टीम फेल
कोकणात जुलै २०२१ मध्ये आलेल्या महाप्रलयानंतर पावसाळ्यातील अतिवृष्टीचा धोका ओळखून आणि त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून जिल्ह्यात खेड, चिपळूण, गुहागर, दापोली आणि राजापूर येथील नद्यांवर आरटीडीएएस अर्थात रियल टाईम डेटा सिस्टीम या अत्याधुनिक सिस्टीमसह १३ ठिकाणी एआरएस म्हणजेच ऍटोमेटीक रेनगेज स्टेशन कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जाहीर झाल्यानंतरही महत्वाच्या क्षणी ही यंत्रणा पूर्णतः फेल ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.तीन वर्षापूर्वी अतिवृष्टीमुळे खेड, चिपळूण, राजापूर या ठिकाणच्या नद्यांना आलेल्या महापुरामुळे मोठी आर्थिक तसेच जीवितहानी झाली होती. ही हानी टाळण्यासाठी नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना मिळावी आणि त्यातून पूर नियंत्रणासाठी प्रशासनाला मदत व्हावी, यादृष्टीने २०२२ पासून ही अत्याधुनिक यंत्रणा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात बसवण्याचा निर्णय झाला. त्यातूनच जलसंपदा विभाग जलविज्ञान प्रकल्प नाशिकच्या माध्यमातून कृष्णा खोर्याच्या धर्तीवर जिल्ह्यासाठी ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली.जिल्ह्यात खेड तालुक्यातील चाटव, पोयनार, नातूवाडी, कशेडी, लवेल, दापोली तालुक्यातील दाभोळ, चिपळूण तालुक्यातील करंबवणे, नांदिवसे, कोंडफसवणे, राजापूर तालुक्यातील अर्जुना धरण, जामदा धरण, आडिवरे संगमेश्वर तालुक्यातील गडनदी धरण अशा तेरा ठिकाणी एआरएस अर्थात ऍटोमेटिक रेनगेज स्टेशन तर खेडमधील जगबुडी, नातूवाडी, चिपळूण येथील बहाद्दूरशेख नाका येथील वाशिष्ठी नदी आणि राजापूर येथील अर्जुना नदी या तीन ठिकाणच्या नद्यांवर आरटीडीएएस यंत्रणा बसवण्यात आली आहे. यासाठी जलसंपदा विभागामार्फत एक लिंकही देण्यात आली असून या लिंकवर क्लिक केल्यानंतर जिल्ह्यातल्या ३ नद्यांच्या पाण्याची पातळी व तेरा ठिकाणचे पर्जन्यमान अचूक मिळेल अस सांगण्यात आले होते. www.konkantoday.com