
प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला आमचा तीव्र विरोध माजी खासदार विनायक राऊत
प्रस्तावित नागपूर-गोवा या शक्तिपीठ महामार्गाला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने तीव्र विरोध दर्शवला आहे. या महामार्गामुळे शेतकर्यांच्या हजारो एकर जमिनींचे नुकसान होणार असून कोकणातील पर्यावरणाचा समतोल बिघडणार असल्याचा आरोप ठाकरे शिवसेनेचे नेते, माजी खा.विनायक राऊत यांनी केला आहे. या महामार्गाला विरोध करणार्या शेतकर्यांच्या पाठीशी शिवसेना खंबीर उभी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत विनायक राऊत बोलत होते. जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, जिल्हा महिला संघटक श्रेया परब, तालुका प्रमुख मायकल डिसोझा, वेंगुर्ले तालुका प्रमुख यशवंत ऊर्फ बाळू परब, शैलेश गवंडळकर, गुणाजी गावडे, विशांत तोरस्कर, रमेश गावकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
महामार्गामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान
शक्तिपीठ महामार्ग सुमारे 800 किलोमीटर लांबीचा असून त्यासाठी 86 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या महामार्गामुळे शेतकर्यांची 27 हजार एकर शेतजमीन रस्त्याखाली जाणार आहे. तसेच 300 फूट रुंदीच्या या महामार्गामुळे कोकणातील निसर्गाचे मोठे नुकसान होणार असल्याचा दावा विनायक राऊत यांनी केला. सिंधुदुर्गातील बारा गावांनी या महामार्गाला विरोध दर्शवला असून ठाकरे शिवसेना आणि पक्षाचे सर्व कार्यकर्ते या शेतकर्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आंदोलन मोडून दाखवा
आमच्या पक्षाचे डॉ. जयेंद्र परुळेकर हे या आंदोलनाचे नेतृत्व पहिल्यापासूनच करत आहेत. शासनाचा हा डाव हाणून पाडण्यासाठी आम्ही रणांगणात उतरलो आहोत. हिंमत असेल तर आमचे आंदोलन धमकी देणार्यांनी मोडून दाखवावे, असे आव्हान विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिले.