
विविध कारणांमुळे आंबा उत्पादक अडचणीत, चालू हंगामातील पीक कर्ज माफ करण्याची आंबा उत्पादकांची मागणी
कोरोनासारखी महामारी, निसर्गाचा लहरीपणा, निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा अशा विचित्र परिस्थितीत सापडून मेटाकुटीस आलेल्या आंबा उत्पादकांना शासनाने पीक कर्ज माफ करावे अशी मागणी आंबा उत्पादकांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावर्षी आंबा उत्पादनाच्या हंगामावर कोरोना आणि लॉकडाऊनमुळे मोठा परिणाम झाला आहे. उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. सन २०२०-२१ या हंगामातील उत्पादकांनी घेतलेले पीक कर्ज माफ करावे तसेच येणार्या हंगामामध्ये आवश्यक असलेली फवारणीची औषधे माफक दरात उपलब्ध करून दिली जावीत. सन २०१४-१५ साली अवकाळी पावसामुळे रत्नागिरी जिल्हा बाधित जाहीर केल्यानंतर शासनाने जाहीर केलेले पीक कर्जावरील व्याजाची रक्कम तात्काळ देण्यात यावी. याच हंगामातील पुनर्गठन केलेल्या पीक कर्जावरील थकीत व्याजाची रक्कम कर्ज खात्यात जमा करावी अशी मागणी आंबा उत्पादकांनी शासनाकडे केली आहे.
www.konkantoday.com