
नळपाणी योजना रत्नागिरी शहरासाठी, पुरवठा मात्र शहराबाहेर
रत्नागिरी शहरासाठी अनेक कोटी रुपये खर्चुन पाणी योजना आणण्यात आली आहे. शहरातील नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी पुढील काही वर्षांचा विचार करून ही योजना आखण्यात आली आहे. मात्र रत्नागिरी नगर परिषद शहराबाहेर तिवंडेवाडी येथे गृहनिर्माण संस्थेला साळवी स्टॉप येथील जलशुद्धीकरण केंद्रातून दोन इंच पाईपलाईन देण्याचा निर्णय घेणार आहे. याबाबत आता भाजपचे नगरसेवक समीर तिवरेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली असून या निर्णयाला विरोध केला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
मुळात रत्नागिरी शहरातही अद्याप अनेक भागात योग्य रितीने पाणी पुरवठा नगरपरिषद करू शकत नाही. असे असताना शहराबाहेरील बिल्डरवर नगरपरिषद एवढी मेहरबान का? असा सवाल आहे. या ठिकाणी राहण्यासाठी आलेल्या लोकांना पाणी मिळणे आवश्यक असले तरी ही जबाबदारी फ्लॅट विकणार्या बिल्डरची आहे. त्याचा भार रत्नागिरी नगरपरिषद आपल्या खांद्यावर का घेत आहे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. याबाबत आता भाजपचे नगरसेवक विरोध करणार असले तरी त्याबाबत सत्ताधारी काय भूमिका घेणार हे आजच्या सभेत ठरेल.
www.konkantoday.com