
जिल्ह्यात लॉकडाऊन होणार शिथिल- भाजप शिष्टमंडळाला जिल्हाधिकार्यांचे आश्वासन
देशात व राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू असताना रत्नागिरी जिल्ह्यात सलग दुसर्यांदा लॉकडाऊन जाहीर झाल्याने सामान्य नागरिकांपासून व्यापारी मंडळी नाराज आहेत. त्यामुळे लोकभावना लक्षात घेऊन लॉकडाऊमध्ये शिथिलता द्यावी, अशी मागणी भाजप शिष्टमंडळाने केली. त्या वेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी यात काही निर्बंध ठेवून शिथिलता देऊ, असे आश्वासन दिल्याची माहिती भाजप द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.
रत्नागिरी जिल्ह्यात 1 ते 8 जुलै कडक लॉकडाऊन झाला. मात्र या कालावधीमध्येही कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. त्यामुळे आजपासून पुन्हा लॉकडाऊन जिल्हाधिकार्यांनी जाहीर केला. याबाबत चर्चा करण्यासाठी भाजप जिल्हाध्यक्षांसह शहराध्यक्ष सचिन करमकर, सरचिटणीस बाबू सुर्वे आणि भाजयुमो शहराध्यक्ष विकी जैन यांनी जिल्हाधिकार्यांची भेट घेतली.
त्या वेळी अॅड. पटवर्धन यांनी जिल्हाधिकार्यांना लोकांची भावना सांगितली. 100 दिवस लॉकडाऊन झाल्यानंतर लोकांची मानसिकता जपण्याची गरज आहे. जनता नाराज आहे. व्यापार बंद आहे आणि अनेकांना नोकर्या गमवाव्या लागल्या आहेत. या सर्व भावना लक्षात घेऊन लॉकडाऊनमध्ये शिथिलता द्यावी, असे पटवून देण्यात जिल्हाध्यक्ष अॅड. पटवर्धन यांना यशस्वी ठरले. त्यामुळे नक्कीच शिथिलता देऊ, अशी ग्वाही दिली.
www.konkantoday.com